म्हटले हा पहा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्या पत्राचा फुसका बार..
पुणे- एकीकडे भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर श्रेय लाटण्याचा आरोप केला असताना दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक चांदेरे यांच्यावर कामाची धड माहिती नाही अन श्रेय लादायला पुढे राही.अशा शब्दात टीका केली आहे .बालवडकर यांनी हि टीका करताना काही कागदपत्रे सादर केली आहेत.
बालवडकर म्हणाले भारतीय जनता पक्षाचे काम बघून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची पायाखालची वाळू सरकली आहे.बालेवाडी – बाणेर परिसराचा पाणी प्रश्न मार्गी लागावा या अनुषंगाने सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. त्याचेच फलित म्हणजे पुणे शहरासाठीच भारतीय जनता पक्षाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच २४x०७ पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर झाला,या योजनेंतर्गत वारजे चांदणी चौक पाषाण सुस ब्रिज ते बाणेर बालेवाडीपर्यंत सर्व पाण्याच्या टाक्यांपर्यंत ट्रान्समिशन लाईन्स ची कामे होत आहेत.ही ३० इंच व्यासाची ट्रान्समिशन लाईन सुस ब्रिज ते सेव्हन अव्हेन्यू सोसायटी शेजारील टाकीपर्यंत येत असून या पाईपलाईनची एकूण लांबी ३.४२३ किमी आहे. यापैकी १.२०० किमी चे काम पूर्ण झाले असून २.२२३ किमी चे काम अद्याप बाकी आहे. भारतीय जनता पक्षाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येत असून हे चित्र विरोधकांना मात्र पहावले जात नाही. त्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्याच्या कुरघोडी सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांना २०२० पाणीप्रश्नाबाबत पत्र दिले होते. जेणेकरून मंजूर झालेल्या या योजनेचे श्रेय लाटता यावे.
परंतु या योजनेची वर्क ऑर्डर २०१८ सालीच निघालेली आहे. हे काम लार्सन अँड टूरबो या कंपनीमार्फत केले जाणार आहे, याची माहिती त्यांनी घ्यावी.हे सर्व काम भारतीय जनता पक्षाच्या काळात मार्गी लागले असून पॅकेज ३ व ६ च्या माध्यमातून होत असणाऱ्या या सर्व कामांची वर्क ऑर्डर देखील २०१८ साली निघालेली आहे. मात्र आत्ता आणि २०२० साली याच पाईपलाईनच्या कामाचे पत्र प्रशासनाला देणे हा निव्वळ अडाणीपणा म्हणता येईल. विशेष म्हणजे हेच पत्र लोकांना दाखवून त्याचे श्रेय घेणे हा तर चिकटू पणाचा कळस गाठण्यासमानच आहे. २०१७ च्या मुख्य सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच या प्रकल्पास विरोध दर्शविला होता. मात्र तेच आता या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत आहेत, ही बाब अतिशय दुर्दैवी म्हणता येईल. प्रशासनाला पत्र लिहून आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी किती पोटतिडकीने प्रयत्न करतो आणि आमच्यामुळेच कसे लोकांचे प्रश्न सुटतात हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करू नये, यातून काहीही सिद्ध होणार नाही. मुळात कोणती योजना कोण राबवित आहे आणि त्यासाठी किती प्रयत्न केले आहेत याचा या महाशयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीला ही वर्क ऑर्डर मिळालेली असून त्यात संपूर्ण योजनेचे आणि योजना राबविण्यात येणाऱ्या जागेचे विश्लेषण उच्च अभियंत्यांमार्फत करण्यात आले आहे. कायदेशीरपणे सर्व गोष्टी अमलात आणण्यासासाठी एक टीम यावर काम करीत असते. या सर्व गोष्टींचे भान विरोधकांना असायला हवे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच महाशयांनी पाषाण-सुस खिंडीचे ४० कोटींचे बजेट आणण्यासाठी स्वतःची औकात नाही हे कबूल केलं होतं. आज तेच महाशय या २२० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे श्रेय निव्वळ एका पत्राच्या बळावर घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्रेय घेण्याच्या नादात सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी थोडे सबुरीने आणि विचारपूर्वक पाऊले उचलावीत हीच अपेक्षा आहे . जेणेकरून वेळोवेळी तोंडघशी पडण्याच्या शृंखलेस तरी आळा बसेल.तसेच या महाशयांच्या पत्राने महानगरपालिकेच्या रद्दी मध्ये वाढ झाली एवढे मात्र खरे आहे असेही बालवडकर यांनी म्हटले आहे.