मुंबई, दि. २०(प्रतिनिधी)- मुंबईचे खास करून मरीन ड्राईव्ह आणि गेट आँफ इंडियाच्या परिसरात देश विदेशातून येणा-या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या व्हिक्टोरियावर(घोडागाडी) बंदी आल्यानंतर आता मुंबईचे आकर्षण जपण्यासाठी आता मुंबईतल्या प्रमुख पर्यटनस्थांवर इलेक्ट्रिकल व्हिक्टोरिया धावणार आहे. बॅटरीवर धावणारी व्हिक्टोरिया आता मुंबईच्या आकर्षणात भर घालणार आहे
मुंबईत ब्रिटिशकाळापासून व्हिक्टोरिया धावत होत्या. गेट वे आँफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पाँईट व गिरगाव चौपाटीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्हिक्टोरिया धावत होत्या. पण या व्हिक्टोरियांच्या विरोधात प्राणीप्रेमी संघटनांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सुमारे चार वर्षांपूर्वी न्यायालयाने व्हिक्टोरियावर बंदी घातली. त्यामुळे व्हिक्टोरिया चालकांसमोर बेरोजगारी व उपासमारीचे संकट निर्माण झाले होते. दरम्यानच्य काळात या व्हिक्टोरिया चालकांचे पुनर्वसन करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
त्यानंतर व्हिक्टोरिया चालकांच्या पुनर्वसनासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी एका कंपनीने परिवहन कंपनीने इलेक्ट्रिकल व्हिक्टोरियाचा प्रस्ताव सादर केला होता. मुंबईत मरीन ड्राईव्ह, चौपाटी, गेट वे आँफ इंडिया आदी ठिकाणी व्हिक्टोरिया धावत होत्या. त्या ठिकाणीच बँटरीवर धावणा-या व्हिक्टोरिया चालवण्याची योजना आहे. या व्हिक्टोरियामध्ये सहा पर्यटक बसतील आणि चालकमार्फत ही व्हिक्टोरिया चालवली जाईल. मात्र या व्हिक्टोरियांची परिवहन श्रेणीत नोंद करावी लागेल. त्यामुळे मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. या व्हिक्टोरियांची परिवहन विभागात नोंदणी केल्यानंतर व्हिक्टोरिया चालकाला परिवहन विभागाचा बॅज घ्यावा लागेल. त्याशिवाय त्याला गणवेश सक्तीचा केला आहे.
राज्य सरकार भाडे निश्चित करणार
राज्याच्या गृहविभागाने आज या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईत इलेक्ट्रिकल व्हिक्टोरिया धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिध्द झाला आहे. आता इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया सुरु झाल्यापासून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत प्रत्येक फेरीचे भाडे हे परवानाधारकास त्याने निश्चित केलेल्या दराप्रमाणे घेता येईल. पण निश्चित केलेल्या भाड्याची आगाऊ माहिती मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाला देणे आवश्यक राहिल. या कालावधीत इलेक्ट्रीकल व्हिक्टोरिया चालवण्याचा अपेक्षित खर्च गृहित धरून पुढे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत भाडे निश्चित करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांची लूट होणार नाही. बँटरीवरील व्हिक्टोरिया ताशी तीश किमी वेगाने धावेल. यामध्ये पर्यंटकांना जीपीएस यंत्रणाही बसवण्यात येणार असून पर्यटकांना ध्वनिक्षेपक यंणेव्दारे आसपासच्या महत्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती दिली जाईल.