मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील लेखक,कवी, सिने-नाट्य कलाकार, पत्रकार आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते येत्या 30 जून रोजी यवत ते वरवंड या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अशी माहिती एस एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष वारे आणि राष्ट्र सेवा दलाचे मुंबई कार्याध्यक्ष शरद कदम यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
विठ्ठल हे बहुजन कष्टकर्यांचे दैवत आहे. इतर देव देवतांसारखा या विठ्ठलला कधीही नवस बोलला जात नाही. संत परंपरेने उपासना पध्दतीतील कर्मकांडाचे अवडंबर नाकारले. ईश्वर केंद्री धर्म, मानव केंद्री केला. एवढेच नव्हे तर “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी!” असे म्हणत “कर्म हीच भक्ती” ही साधी सोपी पण अतिशय महत्वाची शिकवण देखिल रुजविली. वारी ‘ हा त्यामुळेच महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि तसा खरा अध्यात्मिक सोहळा ठरला आहे उदारमतवादी परंपरेचा वारसा जपण्यासाठी यंदा तुकोबाच्या पालखी सोबत दोन पावले चालु या, असे आवाहन करण्यात आले आहे.
संत विचारांचा वारसा आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला मूल्यविचार हातात हात घालून पुढे जावा या साठी या वारी मध्ये संतांच्या अभंगा सोबत संविधानातील मूल्यांचा जागर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे.
रविवार, दिनांक 30 जून 2019 रोजी पुणे सोलापूर मार्गावरील यवत येथून तुकोबारायांची पालखी वरवंड येथे जाण्याकरीता निघेल. समतेचे हे वारकरी सकाळी 7.00 वाजता यवत येथे हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या मार्गदर्शना खाली एकत्र येऊन मोहनभाऊ लवांडे यांच्या श्री काल भैरवनाथ दिंडीत सहभागी होणार आहेत.
संतांनी सामाजिक समतेचा झेंडा पंढरपूरच्या वाळवंटात रोवला आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात विद्रोह केला. नामदेवांपासून ते गाडगेबाबा पर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. त्यात ज्ञानोबा आणि तुकोबांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. मागील काही वर्षे हे समतेचे वारकरी ज्ञानोबांच्या पालखी मध्ये चालत होते. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात चालणार आहेत. *या वर्षी देखील समाजकारण, राजकारण, नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, शिक्षण, आरोग्य, शासन, प्रशासन आणि माध्यम क्षेत्रातील अनेक मंडळी या दिंडीत सामील होणार आहेत, संतांचा समतेचा विचार मानणा-या जास्तीत जास्त लोकांनी या वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.माहिती साठी शरद कदम 9224576702 आणि सुभाष वारे 9822020773 यांच्याशी संपर्क साधावा.