गडचिरोली -पोलिस आणि C-60 पथकाने शनिवारी मोठी नक्षलवाद विरोधी कारवाई केली. यामध्ये नक्षलवाद्यांचा महाराष्ट्र सचिव सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. एकूणच 26 नक्षली ठार झाल्याचे सूत्रांकडून समजते. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पार पडलेल्या या कारवाईमध्ये 3 जवान सुद्धा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ओळख पटविण्याचे काम सुरू
ठार झालेले नक्षलवादी नेमके कोण आहेत त्यांची ओळख पटविण्यासाठी सर्व मृतदेह जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहेत. यातील एक मृतदेह सह्याद्रीचा असू शकतो. यांची ओळख पटविण्यासाठी तज्ञ पोलिसांसह आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींपैकी काही जणांना सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आहे. त्यानंतरच हा सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे होता किंवा नाही हे स्पष्ट होईल. अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी आहेत.
कोण आहेत C-60 नक्षलविरोधी कमांडो?
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.