नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज लॉकडाउन ४ ची घोषणा करण्यात आली. मात्र त्यांनी याचे नियम हे पूर्णपणे वेगळे असतील जे तुम्हाला १८ मे पूर्वी कळवण्यात येतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. आज देशाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला त्यावेळी लॉकडाउन ४ ची त्यांनी घोषणा केली. मात्र याचे नियम या लॉकडाउनचं स्वरुप हे वेगळं असेल असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आज करोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. तसंच आत्मनिर्भर भारत हा नाराही दिला.राज्यांनी लॉकडाउन संदर्भात काही सूचना केल्या आहेत. काही मतं मांडली आहेत. त्यानुसार लॉकडाउनचं स्वरुप असेल. ते नेमकं काय आणि कसं असेल ते १८ मेपूर्वी स्पष्ट करण्यात येईल असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाउन ४ होणार हे नक्की मात्र तो किती कालावधी असेल नवे नियम काय असतील ते समजण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.
२० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीय. अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा हे चक्र पूर्ण क्षमतेनं वापरलं जाण्याची गरज आहे. मागणी वाढवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण सक्षम असायला हवा. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. हे पॅकेज स्वावलंबी भारताला एक नवी गती देणार, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
या आर्थिक पॅकेजशी निगडीत संपूर्ण माहिती अर्थ मंत्री निर्मला सीतारमण येणाऱ्या काही दिवसांत देतील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2487936694639654/
‘करोना महामारी सुरू होऊन आता चार महिने उलटलेत. ४२ लाखांहून अधिक लोक करोनाबाधित आहे. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेक कुटुंबांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. मी या सर्वांप्रती आपली संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसनं जगाला उद्ध्वस्त केलंय. जगभरात करोडो लोक संकाटाचा सामना करत आहेत. आम्ही असं संकट ना पाहिलंय ना ऐकलंय… निश्चितपणे मानवजातीसाठी हे सगळं अकल्पनीय आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. थकवा, हरणं, तुटणं मानवाला मंजूर नाही. सतर्क राहताना नियमांचं पालन करत यापासून संरक्षण करून पुढे वाटचाल करायची आहे. जग संकटात असताना आपला संकल्प आणखीन मजबूत करायला हवा. संकटापेक्षाही आपला संकल्प विराट हवा’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली.२१ वं शतक भारताचं आहे, असं मागच्या शतकापासून आपणं ऐकत आलोय. करोना संकटानंतरही जगात निर्माण होणारी स्थिती आपण न्याहाळत आहोत. भारताच्या नजरेतून पाहिलं तर २१ वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर ही आपली जबाबदारीही असावी. जागतिक स्थिती आपल्याला एकच मार्ग दाखवतेय… स्वावलंबी भारत… असं म्हणत त्यांनी स्वावलंबी भारताची ही भव्य इमारत पाच स्तंभांवर आधारीत असेल असं सांगितलं.