मुंबई -खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) नवनियुक्त अध्यक्ष मनोज कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन, खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या मंत्राचा अवलंब करून भारतीय खादीला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मनोज कुमार यांनी 15 जुलै 2022 रोजी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण केली.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकार्यांना संबोधित करताना अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “आत्मनिर्भर भारताचे” स्वप्न साकार करण्यासाठी लघु आणि सूक्ष्म उद्योगांची मोठ्या प्रमाणावर स्थापन करण्याला तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांद्वारे स्वयंरोजगार निर्माण करून स्वावलंबी भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याला त्यांचे प्राधान्य असेल. “गेल्या काही वर्षांत भारतात खादी पुन्हा लोकप्रिय झाली असून खादीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याला आपण प्राधान्य देऊ” असे कुमार यांनी सांगितले.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष कुमार पुढे म्हणाले की ते खादीला ‘लोकल टू ग्लोबल’ बनवण्याचा आणि भारताच्या स्वदेशी उत्पादनांची जगभरात मागणी वाढवण्याचा प्रयत्न करतील. यामुळे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाशी संबंधित अधिकाधिक कारागिरांच्या हातात पैसा पोहोचेल याची खात्री होईल, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि समाजाच्या शेवटच्या टप्प्यावर उभे असलेले कारागीर आर्थिक विकासाचा भाग बनून स्वावलंबी होतील, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “प्रत्येक हाताला काम मिळावे आणि कामाची रास्त किंमत मिळावी, असा आयोगाचा प्रयत्न असेल”.
मनोज कुमार यांनी असेही सांगितले की, सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आयोगाकडून राबविण्यात येणारे उपक्रम आणि योजना लवकरच सुलभ करण्यात येणार आहे. ते म्हणाले की, खादी उत्पादने ग्राहकांना अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाकडून एक ई-कॉमर्स उपक्रमही हाती घेण्यात आला असून त्यात आणखी सुधारणा केल्या जातील.