अलीगड-जगभर करोना व्हायरसनं धुमाकूळ घातला असतानाच उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यात अचानक शेकडो बगळ्यांचा संदिग्ध मृत्यू झाल्याचं समोर येतंय. अलीगडच्या भुजपुरा भागात ही घटना घडलीय. बगळ्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन अधिकारी इथे दाखल होत झाले. मृत बगळ्यांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत.
गुरुवारी सकाळी भुजपुरा भागात एकाच ठिकाणी डझनभर बगळे मृत पाहून पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी १०० हून अधिक मृत बगळे ताब्यात घेऊन त्यांना जमिनीत दफन केलं. त्यांचे सॅम्पल्स चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.
जिल्हा वन अधिकारी सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बेशुद्धावस्थेत सापडलेल्या बगळ्यालाही ताब्यात घेण्यात आलं. चाचणी अहवाल आल्यानंतरच या बगळ्यांच्या अचानक मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल. ज्या ठिकाणी हे मृत बगळे सापडले आहेत त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.