ग्राहक संरक्षण विधेयकाचे बापट यांच्या कडून स्वागत
नवी दिल्ली : ग्राहकांना आपल्या हक्क आणि अधिकारासंदर्भात विद्यार्थी दशेपासून शिक्षण दिले पाहिजे. या मुळे या ग्राहकांमध्ये जनजागृती होऊन त्यांची होणारी फसवणूक टळेल. असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ‘ग्राहक संरक्षण विधेयक २०१९’ चे स्वागत करताना संसदेत ते बोलत होते.
या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना खासदार बापट म्हणाले, १९८६ पासून आजपर्यंत हे विधेयक कार्यात होते. आजवर या विधेयकामध्ये अनेक वेळा दुरुस्त्या झाल्या,मात्र आज सादर झालेल्या विधेयकांमध्ये ग्राहकाला सर्वोच्च स्थानी ठेऊन विचार केलाय. उत्पादक, वितरक आणि ग्राहक अशी मोठी साखळी देशात सगळ्या करिता कार्यान्वित आहे. ग्राहक हा उपभोक्ता असतो, लाभार्थीं असतो, तो त्या वस्तूंचा वापर करतो, म्हणून सर्वाधिक त्रास त्याला होत असतो. त्याची काळजी या विधेयकामध्ये घेतली आहे म्हणून हे विधेयक वैशिष्ट्यपूर्ण आहे. जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर वेगवेगेळे विभाग करून त्या त्या विभागातील लोकांना न्याय देण्याकरिता या विधेयकामध्ये असणाऱ्या प्रावधानांचा भविष्यात उपयोग होणार आहे.
सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन हे विधेयक तयार केले आहे. ग्राहकाची फसवणूक झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देण्याचे तसेच फसवणूक करणाऱ्याला दंड आणि शिक्षा करण्याचे प्रावधान या विधेयकामध्ये आहे. आजच्या काळाला अनुसरून या विधेयकामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे विक्रेत्यावर आणि व्यापाऱ्यांवर मोठा वचक बसणार आहे.
कायदा निर्माण होण्याआधी त्याच्या पळवाटा तयार होतात या पळवाटा टाळण्यासाठी कायदा भक्कम केला पाहिजे. याच्या प्रभावीपणाने अंमलबजावणीसाठी नवीनवीन माध्यमांचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रामुख्याने संगणकीकरणाचा वापर वाढवला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली पाहिजे, ग्राहकमंचामध्ये महिलांनासुद्धा स्थान मिळावे, देशभरात ‘जागो ग्राहक जागो’ सारखे अभियान राबवले पाहिजे. असे मत व्यक्त करत, नागरिकांनी ही सजग राहून वेळोवेळी ज्या त्या विभागाकडे तक्रार केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल असे ही ते म्हणाले.
न्यायालयांना अधिक निधी दिला पाहिजे :
ग्राहक न्यायालयांना केंद्रामार्फत कमी पैसा मिळतो. बऱ्याच ठिकाणी न्यायालयामध्ये वकिलांना, न्यायाधीशांना बसण्यासाठी जागा नाही, इमारतीला जागा नाही. म्हणून विशेष लक्ष याकडे दिले गेले पाहिजे. न्यायालय ही न्याय देण्याची जागा आहे त्यामुळे त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. अशी अपेक्षा खासदार बापट यांनी यावेळी व्यक्त केली.