मुंबई – दिल्ली ज्याचे ऐकेल आणि दिल्लीचे ऐकेल असे सरकार दिले तरच महाराष्ट्राचा विकास येईल महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीत ज्यांचे सरकार आहे, त्या भाजपचेच राज्यातही सरकार निवडून देणे आवश्यक आहे. स्पष्ट बहुमत जनतेने द्यावे. यावेळी थोडेसे चुकलात तर `त्यांना’ जी नशा चढेल त्यात संपूर्ण देश बरबाद होईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीमुंबईतील सभेतून महाराष्ट्राला दिला.
ज बरदस्तीने घर रिकामे करणे, प्लॉट खाली करणे, गरीबांच्या झोपड्यांवर कब्जा करणे अशा प्रवृत्तींपासून मुंबईकरांना मुक्तता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेसचे मित्र केवळ आपल्यावर टीका करण्यात धन्यता मानतात. कदाचित पाच महिन्यांपूर्वीचा अनुभव ते विसरले असावेत. माझ्यावर जेवढी टीका कराल तेवढे सणसणीत उत्तर जनता तुम्हाला देईल, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी टीकाकारांना दिला.
या राज्यात दरवर्षी ३ हजार ७०० शेतकरी आत्महत्या करीत असताना, गेल्या सरकारमधील कृषी मंत्री काय करीत होते, अशी टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जातीय दंगे होणारे राज्य असल्याची टीकाही त्यांनी केली. १५ वर्षांत सर्वात जास्त दहशतवादी घटना या राज्यात घडल्या. सर्वात अधिक जीवितहानी येथे झाली. मात्र किती गुन्हेगारांना शिक्षा मिळाली. कधी मुख्यमंत्री तर कधी गृहमंत्री बदलून जनतेला न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी केला.
६० वर्षे राज्य करणारे आपल्याकडे ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. मी छोटा माणूस आहे. मी छोट्या माणसांसाठी छोटी-छोटी कामे करीन, असे सांगून देशातील प्रत्येक गरीब नागरिकांसाठी बँकेत खाते उघडण्याच्या कामाचा त्यांनी उल्लेख केला. शून्य पैशात खाते उघडता येणार असून, माझ्या इमानदार पाच कोटी गरीब कुटुंबांनी तीन हजार कोटी रुपये जमा केल्याचे मोदी यांनी सांगितले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी अत्यंत अवघड मार्गाने जावे लागत असे. चीनच्या राष्ट्रपतींशी बोलून सर्व वयोगटातील यात्रेकरूंना मोटारीने जाता येईल असा मार्ग उपलब्ध करून घेतल्याचे मोदी म्हणाले. देशाला मलेरिया, डेंग्यू आणि टीबीपासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेबरोबर औैषध संशोधनाचा करार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
झोपडीधारकांच्या आयुष्याचे कायापालट करण्याचे आपले स्वप्न आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्येक झोपडीधारकाला हक्काचे, राहण्यायोग्य व सर्व नागरी सुविधा असलेले निवास देण्याचा संकल्प मोदी यांनी सोडला. मुंबईत चांगल्या दर्जाची मेट्रो आमचे सरकार आणेल, नवी मुंबईतील एअरपोर्टचे काम मार्गी लावून त्याचे उद्घाटन आमच्या कार्यकाळात होईल. सागरी सेतू पूर्ण करू. खासगीकरणाद्वारे मुंबईतील उपनगरी लोकल सेवा उच्च दर्जाची करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. व्यासपीठावर मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार होते.