सुप्रिया सुळेंंना टक्कर देणारी भेटेना….
पुणे- जिंकून येणाऱ्या ,किंवा यशाची खात्री असणाऱ्या मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्राचारात आघाडी घेतली आहे,बारामती आणि शिरूर,मावळ या मतदार संघातून राष्ट्रवादीला विजयाची पूर्ण आशा आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मुख्य किल्ल्याला सुरुंग लावण्याचा इरादा ठेवणाऱ्या भाजपला मात्र येथे कोणाला उमेदवारी द्यावी हे काही सुचेना असे चित्र दिसते आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढायचे म्हणजे बळीचा बकरा व्हायचे असेच मानले जाते आहे .पण हि रिस्क कोण कशासाठी घेणार हा खरा प्रश्न आहे यामुळे पुणे आम्हाला द्या नाही तर बारामतीवर हल्ला करू अशा तहाच्या डरकाळ्या हवेतच विरत आहेत .केवळ सुप्रियाच्या विरोधात लढलेला उमेदवार म्हणून नाव होईल अशा अर्थाने मात्र काही इच्छुक जरूर आहेत .
पुणे आम्हाला द्या म्हणजे पुण्यात उमेदवार कच्चा ,लेचापेचा द्या तसे करायला कॉंग्रेसला भाग पाडा ,म्हणजे आम्ही बारामती ला तसा उमेदवार देऊ अशी तहाची डरकाळी हि निव्वळ ढोंगी ठरताना दिसते आहे . जिथे सुप्रियाच्या विरोधात उमेदवारच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे . तर एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव हि भाजपच्या नेत्यांनी याबाबत खेळून पाहिला आहे . अर्थात खेळला जातो आहे. पुण्यातील ताकद्वानाला बाजूला करण्यासाठी त्यांच्या घरातील अन्य व्यक्तीला बारामतीला उमेदवारी देवून इतिहास घडवू अशी स्वप्ने दाखविली जात आहेत . पण हे राजकीय डावपेच साऱ्यांच्याच लक्षात येत आहेत.
रंजना कुल ,अर्चना पाटील,राणी भोसले यासह पुण्यातील एका उद्योजकाच्या पत्नीचे नाव बारामतीतून भाजपच्या वतीने चर्चेत आहे.आता नेमके भाजप सुप्रियाच्या विरोधात कोणाला उतरविणार कि नवा चेहरा आणणार हे लवकरच दिसेल . एकीकडे सुप्रियाच्या प्रचाराला कित्येक महिन्यांपासून प्रारंभ झाला आहे. स्वतः सर्व नागरिक कार्यकर्ते यांच्यात मिसळणाऱ्या सुप्रीयांना तोंड देणे तेवढे सोपे नाही पण तरीही रिंगणात’बकरा ‘होण्यासाठी येतेय तरी कोण याबाबत थोडीफार उत्सुकता दिसून येते आहे .
बारामती सह मावळ आणि शिरूरमधील उमेदवार हि राष्ट्रवादीने घोषित करून प्रचाराला प्रारंभ केला आहे. खासदार शिवाजीराव आढळराव हे १५ वर्षे खासदार आहेत . आता त्यांना शह देण्यासाठी प्रखर वकृत्व असलेला तरुण अभिनेता सेनेतुनच फोडून राष्ट्रवादीने त्यांना इथे शह दिला आहे. आढळराव यांचे दिवस भरलेत असेच आता राष्ट्रवादीचे तरी कार्यकर्ते बोलत आहेत . किती वर्षे खासदारकी द्यायची आता जरा नव्या जोमाला संधी देण्याची गरज नाही काय ? असा प्रश्न घेवून येथे प्रचार सुरु झाला आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. मावळात पार्थ अजित पवार यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. पवार घराण्यातील हा नवा तरुण चेहरा राजकारणात उतरला आहे. ज्याला शिवसेनेच्या विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी लढत द्यायची आहे . अजित पवारांसाठी बारामती सह मावळ हि प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे . हे दोन गड तर त्यांना जिंकायचे आहेतच म्हणूनच त्यांनी शिरूर मधून अमोल कोल्हे सारखा चेहरा दिला आहे.विद्यमान खासदार आढळराव आणि बारणे हे चेहरे आता घिसे -पिटे पुराने चेहरे झालेत ,नव्या तरुणाईला त्यांचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादीने इथून पुढे केले आहे. बारामती तर त्यांचा गड आहेच . आणि भाजप बारामतीवर हल्ला करता येईल काय अशा कुचकामी विषयावर वेळ घालवत आहे. भाजप सेनेच्या आढळरावांनी आपला प्रचार सुरु केला असला तरी अद्याप अन्यत्र प्रचाराच्या पातळीवर सामसूम आहे . आणि आता प्रचारासाठी केवळ महिना उरला असताना हि सामसूम भाजपच्या तथाकथीत उमेदवारांना कठीण जाणार आहे.