मुकेश अंबानी आपले 16 लाख कोटी रुपयांहून अधिकचे साम्राज्य नव्या पीढीकडे सोपवण्याची तयारी करत आहेत. धीरुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर संपत्तीच्या वाटणीवरुन मुकेश यांचा त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासोबत वाद झाला होता. अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारी रिलायंस जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिलायंस जिओच्या बोर्डाने त्यांचे सुपुत्र आकाश अंबानी यांची बोर्डाच्या चेअरमनपदी करण्यात आलेल्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
मुकेश अंबानी यांनी गत डिसेंबर महिन्यात कंपनीच्या नेतृत्व बदलावर भाष्य केले होते. ‘मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आणावे लागेल,’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर जिओची कमान नव्या पिढीकडे सोपवण्यात येईल, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. आता ही गोष्ट प्रत्यक्षात आली आहे.
अंबानी कुटुंबाची ओळख
रिलायंस इंडस्ट्रीजचा पाया धीरुभाई अंबानी यांनी रचला होता. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातच्या सौराष्ट्रमधील जुनागड जिल्ह्यात झाला होता. त्यांनी व्यवसायात पाऊल टाकले तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता किंवा बँक बॅलन्स नव्हते. त्यांचे 1955 मध्ये कोकिळाबेन यांच्याशी लग्न झाले. त्यांना मुकेश व अनिल ही 2 मुले, तर दीप्ती व नीना या 2 मुली आहेत. 6 जुलै 2002 रोजी धीरुभाई यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या संपतीच्या वाटणीत पत्नी कोकिळाबेन यांची मुख्य भूमिका पार पडली होती.
आकाश-ईशा व अनंत
1. आकाश अंबानीः 2014 मध्ये ब्राउन यूनिव्हर्सिटीतून इकोनॉमिक्सची डिग्री घेतली. त्यानंतर फॅमिली बिझनेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा जिओ प्लॅटफॉर्म्स, जिओ लिमिटेड, सावन मीडिया, जिओ इन्फोकॉम, रिलायंस रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डात समावेश आहे. 2019 मध्ये त्यांचे श्लोका मेहताशी लग्न झाले.
2. ईशा अंबानीः येल व स्टॅनफोर्डमध्ये शिक्षण घेतले. 2015 मध्ये फॅमिली बिझनेस जॉइन केला. त्यांचाही जिओ प्लॅटफॉर्म्स, जिओ लिमिटेड, रिलायंस रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डात समावेश आहे. ईशाचे लग्न डिसेंबर 2018 मध्ये उद्योगपती अजय पीरामल यांचे सुपुत्र आनंद पीरामल यांच्याशी झाले.
3. अनंत अंबानीः अमेरिकेच्या ब्राउन यूनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले. त्यांचा रिलायंस न्यू एनर्जी, रिलायंस न्यू सोलार एनर्जी, रिलायंस O2C, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बोर्डात समावेश आहे.