मुंबई – कृषीपंपाच्या थकबाकीवरील दंड आणि व्याज बाजूला सारुन शेतकऱ्यांना शासनाच्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ व थकबाकीतून दिलासा मिळावा, वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण या शासकीय कंपनीची राज्यात असलेली वीजबिलाची थकबाकी वसूल होण्यासाठी जनजागृती व्हावी व थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरावे या प्रामाणिक उद्देशाने आपण आमदार महोदयांची यासाठी मदत आणि सहकार्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमदारांना कोणतेही आदेश दिलेले नाहीत तर पत्र पाठवून विनंती करण्यात आली असल्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची कृषीपंप, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांची थकबाकी 24 हजार कोटी रुपयांवर आहे. वीजनिर्मिती, वीजपारेषण, वीजवितरण, कोळसा व साहित्य खरेदी, देखभाल दुरूस्ती आदींसाठी मोठ्या प्रमाणात निधींची गरज आहे. परंतु वीजबिलाची वसूलीच झाली नाही तर ही कामे कशी होतील ? ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वीजबिलाची थकबाकी भरावी यासाठी जनजागृती होऊन एक सकारात्मक संदेश शेतकऱ्यांमध्ये जावा, इतकाच प्रामाणिक उद्देश या पत्रामागे आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या मागे लावून वीजबिल वसूल करण्याचा कोणताही उद्देश या पत्रामागे नाही. तसेच कोणी चुकीचा अर्थही काढू नये असे आवाहन ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.