नाशिक- ‘नरेंद्र मोदी यांनी देश जितका खड्ड्यात घातलाय, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्याही ते करू शकत नाहीत,’ अशी तोफ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डागली. ‘मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांत झालेला भाजपचा पराभव हा जनतेचा मोदींवरील राग आहे. हा रागच मतांमधून बाहेर पडलाय,’ असंही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. दौऱ्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राज यांनी सांगितले. या गर्दीवरुन जनतेचा शिवसेना-भाजपवरील विश्वास उडाल्याचे दिसत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची दुर्दशा होईल, असे भाकितही त्यांनी यावेळी वर्तविले.
राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा सरकारचा कट आहे. सरकारकडे रुपयाही शिल्लक नसून केवळ घोषणाबाजी सुरु आहे, असं सांगतानाच पैसा नाही, मग कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केलं? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेक्कार असल्याचा टोलाही राज यांनी यावेळी लगावला.
जनतेने मोदींवरचा राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला..
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. हा मोदींवरचा राग आहे. जनतेने आपला राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला, अशी खोचक टीकाही राज ठाकरे यांनी केली. राज यांनी मोबाईल कॉल आणि इंटरनेट डेटावरील सरकारी पहाऱ्यावर संताप व्यक्त केला. मोदींनी आधी जगतेच्या घरातील पैसे काढले, आता लोकांच्या घरात घुसणार का? असा सवाल उपस्थित केला.
फावडे -कुर्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं..
लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेणे म्हणजे भाजपसाठी फावडे -कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं आहे.
हनुमान उडत असल्यान ….
हनुमानाच्या जातीवरून राजकीय नेते करत असलेल्या अनावश्यक चर्चेचाही राज यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. ‘हनुमान उडत असल्यानं वेगवेगळ्या देशात जात असणार. त्यामुळं तो सगळ्यांना आपला वाटत असणार, असा टोला त्यांनी लगावला.
‘ते’ गडकरींचे शत्रू असावेत!
पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबदद्ल विचारलं असता, ‘गडकरींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा करणारे बहुधा त्यांचे शत्रू असावेत, असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं.
नरेंद्र मोदींचा लग्नावर विश्वास आहे काय ?
अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असून मुंबईतील सेंट रेजिस येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याविषयी राज ठाकरेंना शनिवारी प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, अमितचं लग्न साधेपणाने करणार आहोत. मी दोन- तीन महिन्यांपूर्वी सहज आकडा काढला तर हा आकडा माझा पक्ष, इतर पक्ष, सामाजिक संस्था, मित्र- पत्रकार असे मिळून किमान साडे पाच ते सहा लाखांच्या घरात गेला. त्यामुळे सर्वांना लग्नात बोलावणे शक्य नाही. आमच्या हौसेसाठी दाम्पत्याची फरफट करणेही योग्य नाही. माझ्याच पक्षाचा विचार केला तर फक्त मुंबईतील गटाध्यक्षांची संख्याच ११ हजार होती. आता लग्नात ते एकटे येणार नाहीत. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही असतीलच, हे सगळं हाताबाहेरचे प्रकरण असल्याने मोजक्या लोकांनाच लग्नाला बोलावणार, असे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींना लग्नाची पत्रिका देणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, मोदींना लग्नावर विश्वास आहे का?. राज ठाकरेंच्या या प्रति प्रश्नाने उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. दरम्यान, शुक्रवारीच राज ठाकरेंनी अमित आणि मितालीच्या लग्नाची पत्रिका सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवून देवीचे आशीर्वाद घेतले होते.