काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला
पुणेः निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या हे देशाला लुटून विदेशात गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच त्यांना चोर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांना चोर म्हटलं तर काय वाईट म्हटले आहे. राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरत आहे, असा सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या भाषणांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणत होते. त्यावरून काँग्रेसबरोबर असलेले उद्धव ठाकरे हे नाराज झाले होते. ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावले होते. आता मात्र या मुद्द्यावरून काँग्रेसने पूर्णपणे माघार घेतली आहे. काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला आहे. विरोधकांची एकमत झाले असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
देशातील अर्थव्यवस्था, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, चीनने बळकविलेला प्रदेश, सरकारी कंपन्यांची विक्री अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संसदेत ते प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर खोटी कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीचा गळा घोटत आहे. त्यांचे हे कृत्य आम्ही उघडकीस आणणार आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्दबाबत चव्हाण म्हटले की विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून हे करण्यात येत आहे. मूळात पुर्णेश मोदी यांना राहुल गांधींविरोधात खटला दाखल करण्याचा अधिकार नाही. ज्यांची मानहानी झाली आहे, त्यांनी खटला दाखल केला पाहिजे. मानहानीचा कायदा १६० वर्षे जुना आहे. आतापर्यंत कोणालाही दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेली नाही. दहा वर्षे शिक्षा झालेले राष्ट्रवादीचे खासदार फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे.
मोदी व अदानी यांचे काय संबंध आहे हे सर्व देशाला माहीत आहे. अदानी यांच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये कसे गुंतवलेले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. सेबी, कंपनी मंत्रालयाने, रिझर्व्हे बँकेने अदानी समूहाला बँकांनी कसे कर्ज दिले आहे. अदानीच्या कंपनीमध्ये एलआयसीचे कशी गुंतवणूक केली आहे, याची चौकशीची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.