संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांचे निर्देश
पुणे, दि. ५ जुलै २०२६: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान अवघ्या काही दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या संपूर्ण पालखी मार्ग, विसाव्याची ठिकाणे आणि मुक्कामाच्या स्थळांवर चोख विद्युत सुरक्षा ठेवण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. ४) आयोजित बैठकीत विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.
आषाढी वारीमध्ये विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पालखी मार्गाचे पुन्हा एकदा ‘वॉक डाऊन’ सर्वेक्षण करावे आणि विद्युत सुरक्षेचे ‘ऑडिट’ पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश श्री. औंढेकर यांनी दिले.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’ सभागृहात आयोजित पुणे परिमंडलाच्या या आढावा बैठकीला मुख्य अभियंता (वितरण) अंकुर कावळे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, संजय वाघमारे यांच्यासह सर्व कार्यकारी व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
संचालक श्री. धनंजय औंढेकर म्हणाले की, आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी पायी चालतात आणि माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. अशा वेळी पालखी सोहळ्याचा मार्ग, विसावा आणि मुक्कामाची ठिकाणे येथे वीज यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असणे गरजेचे आहे. महावितरणसाठी ही केवळ एक जबाबदारी नसून ‘माऊलींची सेवा’ करण्याची मोठी संधी आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व रोहित्रांना सुरक्षिततेच्या दृष्टीने शॉक प्रूफ एफआरपी कुंपण घालण्यात यावे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वीजवाहिन्यांची उंची वाढवून, त्यांच्या खाली योग्य ‘गार्डिंग’ची (सुरक्षा जाळी) व्यवस्था करावी. मुक्कामाच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ नये म्हणून पर्यायी वीजपुरवठ्याची यंत्रणा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी वीज यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सुरळीत वीजपुरवठ्यात हयगय झाल्यास थेट कारवाई
पुणे परिमंडलातील गेल्या तीन महिन्यांतील वीजपुरवठ्याचा आढावा घेताना काही भागांत दीर्घकाळ वीज खंडित झाल्याच्या प्रकारांवर संचालक श्री. औंढेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अभियंत्यांना कडक शब्दांत ‘अल्टिमेटम’ देत ते म्हणाले की, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप तर होतोच, शिवाय महावितरणचा लाखो रुपयांचा महसूलही बुडतो. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी या बैठकीत मार्गदर्शनही केले. मात्र यापुढे वीजपुरवठा खंडित होण्यामागे जर कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची हयगय आढळली, तर ती अजिबात सहन केली जाणार नाही आणि संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.

