पुणे: पुणे हे विद्येचे माहेरघर असण्यासोबतच सांस्कृतिक वारसा आणि मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मंदिरांमधील संस्कृती जपणे, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि उत्तम व्यवस्थापनाद्वारे मंदिरांचा कायापालट करणे या उद्देशाने ‘नागरिक सोशल फाउंडेशन’च्या ‘भक्ती शक्ती’ विभागामार्फत ‘आदर्श मंदिर स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती ‘नागरिक सोशल फाउंडेशन’च्या वतीने सायली गोडबोले – जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नागरिक सोशल फाउंडेशनचे संचालक अमेय सप्रे, सीए सर्वेश मेहेंदळे , चंद्रशेखर शिरुडे, पूजा भंडारे, सुधीर जोशी आदी उपस्थित होते.
मंदिरं ही केवळ धार्मिक स्थळं नसून ती समाजप्रबोधन आणि शिस्तीची केंद्रे आहेत. जुन्या आणि दुर्लक्षित मंदिरांना पुन्हा प्रकाशझोतात आणणे, मंदिरांविषयी समाजात आस्था निर्माण करणे आणि ही मंदिरे आपल्या सांस्कृतिक वैभवाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा १५ जुलै २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. स्पर्धा पूर्णतः विनामूल्य आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंदिरांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक: ३१,०००/- रुपये, द्वितीय पारितोषिक: २१,०००/- रुपये, तृतीय पारितोषिक: ११,०००/- रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक: ७,५००/- रुपये अशी पारितोषिकं असणार आहेत.
आपल्या संस्कृतीच्या जतनासाठी आणि मंदिरांच्या आधुनिक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंदिरांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन ‘नागरिक सोशल फाउंडेशन’तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी इच्छुक मंदिरांनी 9970154167/ 9822848287 या क्रमांकावर ‘नागरिक सोशल फाउंडेशन’च्या ‘भक्ती शक्ती’ विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

