स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश
पुणे, दि. २ जुलै : आगामी पालखी सोहळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत, तसेच यासाठी विशेष मोहीम तातडीने हाती घ्यावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले.
सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित व अतिक्रमणमुक्त पदपथ हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षानेही अतिक्रमणमुक्त पदपथांची भूमिका सातत्याने मांडली असून, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने प्रशासनाला प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिल्याचे भिमाले यांनी सांगितले.
शहरातील तुटलेले, अतिक्रमणग्रस्त, खोदाईनंतर पूर्ववत न झालेले तसेच दिव्यांगांसाठी अनुपयुक्त पदपथ तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले. गॅस पाइपलाइन, पाणीपुरवठा, वीज आणि दूरसंचार विभागांनी खोदाई केल्यानंतर पदपथ पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्याचेही निर्देश देण्यात आले.
विश्रामबाग आणि कसबा पेठ परिसरात सुरू करण्यात आलेल्या “फुटपाथ पॅट्रोल” उपक्रमाचा विस्तार शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तातडीने करण्यात यावा, तसेच सर्व पदपथांचे जीआयएस आधारित सर्वेक्षण करावे असेही बैठकीत ठरविण्यात आले.
याशिवाय शाळा, रुग्णालये, बाजारपेठा, बसस्थानके या ठिकाणचे पदपथांना प्राधान्याने दुरुस्त करणे, नवीन पदपथ दिव्यांगसुलभ निकषांनुसार विकसित करणे, प्रत्येक प्रभागासाठी पदपथ दुरुस्तीचे वेळापत्रक जाहीर करणे आणि कामांची तृतीय पक्षामार्फत गुणवत्ता तपासणी करणे, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
येरवड्यातील बिंदूमाधव ठाकरे चौक–आंबेडकर चौक रस्त्याची ३० मीटर प्रमाणरेषा ; रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
येरवड्यातील बिंदूमाधव ठाकरे चौक, संगमवाडी ते आंबेडकर चौक या दरम्यानच्या सध्या २० ते २५ मीटर रुंदीच्या रस्त्याची प्रमाणरेषा ३० मीटर निश्चित करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या प्रस्तावानुसार भूसंपादन व व्यवस्थापन विभागाने संबंधित विभागांचे अभिप्राय मागविल्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. ऑक्टोबर २०२५ मध्ये स्थायी समितीने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यास मंजुरी दिल्यानंतर यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते.
या प्रक्रियेत डेक्कन कॉलेज पुणे ट्रस्टने रस्तारुंदीबाबत हरकत नोंदविली होती. या हरकतीवर १३ मार्च २०२६ रोजी महापालिका आयुक्तांसमोर सुनावणी झाली. ट्रस्टच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रस्तावित रस्तारुंदी आवश्यक असल्याचे नमूद करत महापालिका आयुक्तांनी हरकत फेटाळली आणि प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाने आता या मार्गाची ३० मीटर रस्तारुंदीची प्रमाणरेषा निश्चित करण्यासाठी स्थायी समितीची मान्यता मागितली होती. प्रमाणरेषा निश्चित झाल्यानंतर भविष्यात रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन, आराखडा मंजुरी आणि विकासकामे करण्यास कायदेशीर आधार मिळणार आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा येरवडा, संगमवाडी, विमाननगर, पुणे स्टेशन आणि नगर रस्ता परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना होण्याची अपेक्षा आहे. सध्या या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होते. रस्तारुंदीकरण झाल्यानंतर वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होईल, प्रवासाचा वेळ कमी होऊ शकेल आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग उपलब्ध होणे सुलभ होईल.
याशिवाय पदपथ, पर्जन्यजल वाहिन्या, भूमिगत सुविधा आणि अन्य नागरी पायाभूत सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करण्यासही या निर्णयामुळे मदत होणार आहे. भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून रस्त्याच्या विस्तारासाठी आवश्यक नियोजन आतापासून करता येणार असल्याने या मार्गाच्या दीर्घकालीन विकासाला गती मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

