३ दिवसीय हिरवाई महोत्सवाचा समारोप.
पुणे :जिविधा ‘ संस्थेतर्फे आयोजित ३ दिवसीय हिरवाई महोत्सवाचा समारोप शनीवारी सायंकाळी झाला.
या महोत्सवाची सांगता दरवर्षी प्रमाणे महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.शनिवार , दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी महाकवी कालिदास रचित कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज अनुवादित ‘संगीत मेघदूत’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
संहिता लेखन डॉ.मंदार दातार यांचे होते. संगीत अमोल अशोक काळे यांचे होते. अमोल काळे व स्वामिनी कुलकर्णी (गायन ) , महेश कुलकर्णी( तबला ) , रुद्र जोगळेकर ( तबला, डफ, घटम, खंजिरी ), ओवी काळे, मोहिनी कुलकर्णी ( तालवाद्य ), गौरव बर्वे (यक्ष वाचन ),स्वामिनी कुलकर्णी ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र( राजेंद्रनगर ) येथे हा महोत्सव झाला.
बांबू लागवडीवर मार्गदर्शन
त्याआधी दोन दिवस ‘ बांबू आणि पर्यावरण’ या विषयावर डॉ. हेमंत बेडेकर यांची व्याख्याने झाली. बदलते निसर्ग चक्र, बांबूचे पर्यावरणातील स्थान, पाऊस,वारा, माती आणि पाणी संवर्धन, बांबू आणि पाणी शुद्धीकरण, बांबू उद्यान आणि आपले स्वास्थ्य, बांबू आणि प्राणवायू, नदीकाठ आणि बांबू या विषयाचा उहापोह या व्याख्यानात झाला
डॉ. बेडेकर म्हणाले, ‘दुष्काळी भाग वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या धरणांचा उपयोग उस लागवडीसाठी केला जात आहे. पावसाचे पाणी अडवायला गवत उरले नाही. अती चराई, अती झाड तोडीने जंगले संपली. गुरांच्या पोषणासाठी गवताच्या नर्सरी कराव्या लागणार आहेत.निसर्गचक्र पूर्ववत केले पाहिजे .शेतीत मोनो कल्चर आले असून मिश्र पिकांची सवय गेल्याने शेतीतील कार्बन कमी झालेला आहे.झाड,पाणी, प्राणी, माणूस एकत्र राहिले पाहिजे.परिसंस्थेचे पुनरूज्जीवन झाले पाहिजे. शाश्वत शेतीची कास धरली पाहिजे.
‘जिविधा ‘ चे संस्थापक राजीव पंडित, सौ.वृंदा पंडित यांनी स्वागत केले.
.देशी वनस्पतींच्या लागवडीच्या कामात सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढावा यासाठी गेली १२ वर्षे हा उपक्रम जीविधा संस्था आयोजित करते.
या वर्षीच्या हिरवाई महोत्सवातून ‘बांबू’ या वनस्पतीच्या माहिती आणि जनजागृतीवर भर दिला गेला.