पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतरही या आरोपासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. पंतप्रधानांच्या वक्तव्याची नोंद झालेली असते. यंत्रणा त्याअनुषंगाने तपास करत असतात. कारवाई होत नसेल तर पंतप्रधानांनी खोटे आरोप केले असा अर्थ होतो. सरकारने दहा दिवसांत गुन्हा दाखल करावा, अन्यथा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांची माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. पंतप्रधानांचा खोटेपणा जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला.
आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी भोपाळ येथे सभेत वक्तव्य केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 हजार कोटीचा घोटाळा केला आहे. मात्र, त्याचावर कोणतीच कारवाई अद्याप झाली नाही. अशाच प्रकारे काँग्रेस काळात आरोप झाले त्यात निष्पन्न काही झाले नाही. पण जे नेते अडकले त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात आले. त्यामुळे या अनुभवातून आम्ही मागील दहा वर्षात भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्यांची यादी पाहिली असता, अद्याप त्यात तपास यंत्रणांनी चौकशी करून कोणाला शिक्षा झालेली नाही. महाराष्ट्र मध्ये सध्या खोके, दामदाटीचे राजकारण सुरू आहे अशी चर्चा आहे. भाजप आणि मोदी यांना आमचे आव्हान आहे की, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या भ्रष्टाचार विरोधात तक्रार दाखल करावी.
या भ्रष्ट्राचाराविरोधात एफ. आय. आर. दाखल करा अन्यथा पंतप्रधान यांचे वक्तव्य खोटे आहे, ते पक्ष संपवत आहे, याचा खुलासा करावा. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असेही ते म्हणाले. देशातील राजकारण दमदाटी, भीतीचे होऊ नये यासाठी काँग्रेस, शिवसेना पक्ष यांनी आंदोलनात सहभागी व्हावे. दरवेळी न्यायालयात जाणे थांबवले पाहिजे त्यांना काही अधिकार नसतात हे कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगू शकतो. कायद्याच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.