जळगाव-
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.
ना. धों. महानोर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.
एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीते आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध करणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत.
नामदेव धोंडो महानोर असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना होय.
मराठी कवितेच्या प्रांतातला भावशील कवी..
ना.धों. महानोर म्हटलं की, रानातल्या, शेतातल्या निसर्ग सौंदर्याचा आविष्कार व्यक्त करणारा भावकवी. आपल्या जगण्याचं सूत्र निसर्गाच्या कलात्मकतेत शोधणारा संवेदनशील मनाचा कवी.
‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे’, ‘नांगरून पडलेली जमीन’, ‘नदीचा काठ’, ‘पक्षांचे लक्ष थवे’, ‘झाडे झाली हिरवीशी’ आणि ‘मन चिंब पावसाळी’ या त्यांच्या निसर्गकविता आपल्या मनाला खूप भावतात.
तर ‘चवळीची शेंग’, ‘विस्तीर्ण नदीचा काठ’, ‘पोर तोऱ्यात ऐन भरात’, ‘नुकत्या न्हालेल्या केसांना’ आणि ‘माळ्याच्या मळ्यात’ या प्रेमभावनेच्या कविता प्रेमातील विविध भावछटा दाखवितात. लोकपरंपरेतल्या लोकधारेशी खऱ्या अर्थाने नाळ जोडणारा हा कवी जात्यावरची ओवीशी नातं जोडणारा होता.
महानोरांच्या गीतात्म कविता तर आमच्या विद्यार्थीदशेतपासून हृदयात ठाण मांडून आहेत मांडून आहेत. मराठीतल्या अनेक चित्रपटातील त्यांची गाणी म्हणजे मनाला भावणारी लोकगीतेच. ‘ हिरव्या पानात पानात’, ‘ घन ओथंबून येती’, ‘आज उदास उदास’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘दूरच्या रानात’, ‘चिंब पावसानं रान’ या त्यांच्या गीतात्म कविता आजही आपले भान हरपून टाकतात.
शिवाजी विद्यापीठाने याचवर्षी बी.ए.भाग २ च्या अभ्यासक्रमात महानोरांच्या कविता आणल्या आहेत. या कवितेवर बोलण्याची संधी आली आणि आज अचानक महानोर गेले. खूप दुःखदायक घटना.
त्यांना भावपूर्ण आदरांजली..