पुणे -आदिवासी मुलांचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या कला उपक्रमांचे आश्रम शाळांमध्ये आयोजन करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती, आदिवासी विकास विभागाच्या राज्याच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘आर्ट इंडिया फाउंडेशन’च्या वतीने ‘खुला आसमान’ या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गुंडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या मार्गदर्शन करीत होत्या. विभागाच्या सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे, आर्ट इंडियाच्या विश्वस्त डॉ. प्राची साठे, चित्रा वैद्य, वनवासी कल्याण आश्रमाचे सुहास पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुंडे म्हणाल्या, ‘आश्रम शाळेतील कला, संगणक आदी विषयांच्या शिक्षकांचे काही प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहोत. आश्रम शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन सारखे उपक्रम लवकरच सुरू केले जातील.’
गुंडे पुढे म्हणाल्या, ‘मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीला वाव देणारे ‘खुला आसमान’ सारखे कला उपक्रम महत्वाचे आहेत. त्यातून आत्मसन्मान आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. या उपक्रमाची व्याप्ती मोठी आहे. आश्रम शाळांतील मुलांच्या सृजनशीलता आणि कल्पकतेला वाव देण्यासाठी कला शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी आर्ट इंडियाचे संस्थापक मिलिंद साठे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.’
चौकट
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन
विद्यार्थ्यांनी काढलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात सुरू झाले आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी चित्रे प्रदर्शनात पाहायला मिळतील. 29 जुलैपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.