मार्केट व हॉटेल्सच्या कचऱ्यामुळे आरोग्यास निर्माण होतोय धोका
पुणे – चिकन, मटन, अंडी, मासे अशा मांसाहारी पदार्थांचा कचऱा आरोग्यास धोकादायक ठरू शकतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याच्या सूचना राज्य सरकारने महापालिकांना द्याव्यात, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेद्धारे आज (बुधवारी) केली.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये औंध, बोपोडी भागामध्ये अंडी, चिकन, मटन अशा सर्व प्रकारच्या विक्रेत्यांचे मार्केट व हॉटेल्स आहेत. हा परिसर अतिशय गजबजलेला असून ही दुकाने व हॉटेल्स सकाळपासूनच सुरू असतात. काही दुकानदार व हॉटेलचे कर्मचारी रात्री आपला व्यवसाय बंद करताना उर्वरित राहिलेले चिकन, मटन, अंडी, मासे याचा निरुपयोगी कचरा मुळा नदीपात्रात टाकतात. यामुळे दुर्गंधीचा त्रास होतो आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नदीही प्रदूषित होते. अशा समस्या पुणे शहरात इतरत्रही निर्माण होत आहेत, असे आमदार शिरोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता पुणे महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारची उपाययोजना कार्यरत नाही. दररोज पुणे शहरामध्ये हा कचरा जवळपास १० टनापर्यंत जमा होत असल्याचा अंदाज आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर येणाऱ्या काळात पुणे शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. पूर्वी महापालिकेकडे अशा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा होती. गेल्या दोन वर्षांपासून ती बंद आहे. महापालिकेकडे भरपूर जागा उपलब्ध आहे. ज्याठिकाणी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी मांसाहारी पदार्थांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा प्रकल्प उभारण्याची अत्यंत गरज आहे. ही उपाययोजना तातडीने होण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारने सूचना द्याव्यात आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
लवकरच पुणे महापालिकेला चिकन, मटन, अंडी, मासे याच्या निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मंत्री महोदय उदय सामंत यांनी दिले.