मुंबई-तुम्ही मविआ सरकार घरात बसून फेसबुक लाईव्हवर चालवले. शिंदे-फडणवीस सरकार जनतेत उतरून त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नागरिक सुविधा कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवले तर शिवसेना ,काँग्रेसच्या पोटात दुखायचे कारणच काय ? अशा शब्दांत मुंबई भाजपाने ट्विट करत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबईकरांना न्याय मिळू नये अशी तुमची इच्छा आहे का ? असाही सवालही उपस्थित करण्यात आला.
पर्यटन, कौशल्य, रोजगार मंत्री व उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ६ जून २०२३ रोजी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवून नागरी समस्या निवारणासंदर्भात नागरिक कक्षाची स्थापना करण्याच्या दृष्टीने मुख्यालयात कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली. महापालिकेकडे नागरी समस्या सोडवण्यासाठी व नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी हे दालन उपनगराचे पालकमंत्री लोढा यांना उपलब्ध करून दिले आहे. सरकार आपल्या दारी या संकल्पनेद्वारे पालकमंत्री हे महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये जाऊन जनता दरबार घेत आहेत, या कामांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तसेच समस्या मांडणाऱ्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यालयात हे कार्यालय सुरू करून एक प्रकारे जनतेला न्याय देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.