पुणे : आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत कबीर, संत चोखामेळा यांना का विसरत नाही? आपण आपल्याला का विसरतो? याचे कारण, जी माणसे आपल्याच रक्ताचा विचार करतात, त्यांचे रक्त एक दिवस त्यांनाच विसरल्याशिवाय रहात नाही. जी माणसे देश, धर्म, परमार्थ, गरीबाचा विचार करतात, आज हजार वर्ष झाली तरी लोक त्यांना विसरायला तयार नाहीत. त्यामुळे माणसाने देश, धर्म, परमेश्वरासाठी समर्पित असायला हवे. समर्पणाशिवाय आपण टिकू शकणार नाही, असे नागपूरचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. कीर्तनमालेत नागपूरचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, टाळवादक माऊली टाकळकर, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय महाराज पाचपोर म्हणाले, ज्या ठिकाणी गरज असेल, त्याठिकाणी धार्मिकता पोहोचली पाहिजे. ज्याला आधार नसेल, त्यांना आधार देण्याचे काम या देशातील धार्मिकतेने केले पाहिजे. ज्याला गरज असेल, त्यालाच दान द्यायला हवे. ज्याला गरज नाही, त्याला दान मिळाले तर तो व्यक्ती विलासी होईल. त्यामुळे अनाथ, गरीब, रुग्ण, गोशाळेपर्यंत पोहोचणा-या महाराष्ट्रात अनेक विश्वस्त संस्था आहेत. त्यामध्ये धार्मिकतेसोबत उत्तम सामाजिक कार्य दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कार्य करीत आहे. त्याचे अनुकरण सर्वांनी करायला हवे.