पाटणा–
आमच्यात काही मतभेद असू शकतील. पण देशाची एकता आणि अखंडता आबाधीत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. बिहार मधील पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पाटण्यात शुक्रवारी विरोधी पक्षांची पहली बैठक झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना UPA चे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली आहे.
या बैठकीनंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमागील उद्देष्ट स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘तुम्ही पाहात आहात की, जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वच पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. सर्वांना हे माहित आहे की, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत, त्यामुळे आमच्यात काही मतभिन्नता असू शकते. मात्र, आमचा देश एक आहे. आणि या देशाला वाचवण्यासाठी आणि देशाची एकता अखंडीतता अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि यापुढे जेव्हा कधी देशाच्या लोकशाहीवर हल्ला होईल, त्याचा आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विरोध करणार आहोत. विरोधी पक्षांच्या एकत्र येण्यावर कायमच शंका उपस्थित केली जाते. मात्र मी स्वतःला विरोधी पक्ष मानत नाही. जे देशद्रोही आहेत, त्यांचे आम्ही विरोधक आहोत. आज पासून चांगली सुरुवात झाली आहे आणि मला विश्वास आहे की, सुरुवात चांगली झाली की, पुढील काळात देखील सर्व चांगले होईल. आता यापुढे आम्ही भेटत राहू आणि बाकीच्या गोष्टी नक्की ठरवलेल्या जातील.’