पुणे :
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित ,सौ.दीपाली पाटवदकर लिखित ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात लेखक -समीक्षक सौ. शेफाली वैद्य, लेखक अभिजित जोग तसेच साप्ताहिक विवेकच्या संपादक सौ. अश्विनी मयेकर, किरण कीर्तने यांच्या हस्ते झाले. रविवार, १८ जून २०२३ रोजी,सायंकाळी सहा वाजता स्वा. सावरकर अध्यासन केंद्र ( कर्वे रस्ता ) येथे हा कार्यक्रम झाला.
शेफाली वैद्य म्हणाल्या,’ आग्नेय आशियामध्ये भारतीय संस्कृतीची स्वस्तीचिन्ह पावलोपावली दिसतात. तेथील आचार विचार, रितीरिवाजावर भारतीय संस्कृतीचा ठसा आहे. हे ठसे विनाशकारी नव्हती तर मंगलमय होती.भारताने जगाला काय काय दिले, याचा अभ्यास करताना आपण काय हरवलं याचीही नोंद ठेवली पाहिजे. आपण पूर्वी महान होतो, हा अभिमान मानून थांबता कामा नये, तर आपल्या देशाचा विस्तार कमी कमी का होत गेला, याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि इथून पुढे सतर्क राहिले पाहिजे. धडा घेतला पाहिजे.आपला वारसा का आक्रसला याचा अभ्यास करून तसे पुन्हा होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे ‘.
‘ असत्यमेव जयते ‘ पुस्तकाचे लेखक अभिजीत जोग म्हणाले, ‘ आपण कोण होतो, कुठून आलो हा प्रवास म्हणजे इतिहास आहे. खरा इतिहास हीच आपली ओळख आहे. आपल्या देशाची खरी ओळख शोधली पाहिजे. भविष्यासाठी ते आवश्यक आहे.काही शक्तींनी चुकीची ओळख देशावर लादली.इस्लामी आक्रमकांनी वास्तूंचा विध्वंस केला, माणसं मारली. पण,ब्रिटिशांनी कारकुनी लादून आपल्याला गुलाम केले. संस्कृती विसरायला लावली. तत्पूर्वी सर्व ज्ञानशाखांचा पाया भारताने घातला, हे मान्य केले पाहिजे ‘.
‘सनावळयांच्या पालिकडे इतिहासाचा अभ्यास व्हायला हवा, पूरक वाचन म्हणून अशी पुस्तके अभ्यासक्रमात घेतली पाहिजे ‘, असे मत अश्विनी मयेकर यांनी व्यक्त केले.
पुस्तकाच्या लेखिका दीपाली पाटवदकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वाती कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. वसुधा करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. मंजुषा लिमये यांनी सूत्रसंचालन केले.दीप्ती खरे यांनी आभार मानले.
मनोवेधक प्रवास : ” स्वस्तिचिन्हे “
देव, धर्म, भाषा, शब्द, लिपी, ग्रंथ, कथा, काव्य, पंचांग, गणित, विज्ञान, कला या क्षेत्राद्वारे जी भारतीय संस्कृती देशविदेशात पोचली, तिथल्या मूळ संस्कृतीशी एकजीव झाली, तिचा मनोवेधक प्रवास ” स्वस्तिचिन्हे ” या ग्रंथातून लेखिकेने घेतला आहे. रामकथेच्या अशाच वाटचालीवरच्या रामकथामाला या ग्रंथानंतरचे लेखिकेचे हे नवे पुस्तक आहे.
कंबोडियाच्या ध्वजावर विष्णूचे मंदिर, थायलंडच्या राज्याच्या झेंड्यावर ऐरावत, इंडोनेशियामधील विद्यापीठांच्या लोगोवर गणपती, आग्नेय आशियाई देशांच्या समुद्री स्पर्धेचे चिन्ह समुद्रस्नान करणारा हनुमान,आशियाई तिरंदाजी खेळांचे चिन्ह धनुर्धारी राम, पांडव वंशातील मातेच्या पोटी घटोत्कचाचा पुनर्जन्म आणि त्याचा बदला घेण्यासाठी आलेला चिरंजीव अश्वत्थामा यांची कहाणी सांगणारा इंडोनेशियाचा 2021 चा चित्रपट ” क्षत्रिय देव घटोत्कच अशा अनेक गोष्टींचा या पुस्तकात समावेश आहे.