मुंबई, ता. १: महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेल्या लढ्यात अजरामर ठरलेल्या १०६ वीरांचे स्मृतिस्थळ असलेल्या हुतात्मा चौकात आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाऊन स्मारकाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी नुकताच प्रकाशित केलेला “उपसभापती कार्यालयाचा कार्य अहवाल” यावेळी स्मारकाजवळ लोकार्पण केला. हुतात्मा स्मारकाच्या टपाल तिकीटाची निर्मिती करण्यासाठीचा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.
शासकीय निवास स्थानी ध्वजवंदन
आज सोमवार, दिनांक १ मे, २०२३ रोजी विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान “पुरंदर” येथे महाराष्ट्रदिना निमित्त ध्वजवंदन केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबूडकर, विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, संतोष उडतेवार, स्विय सहाय्यक अनिल कदम,
योगेश जाधव, कौस्तुभ खांडेकर आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राची निर्मिती करताना ज्या ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान केले आहे, त्यांचे स्मरण कायमच या राज्याला राहील. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये हुतात्मा झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न घेऊन या पुढील काळात काम करणार आहे.”
महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विधान भवन, मुंबई येथे ध्वजवंदन कार्यक्रमात प्रमुख सहभाग
यानंतर विधान भवन येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते विधान भवनातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ११ सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधान भवनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.