मुंबई-बारसू येथे बेकायदा जमीन घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, अशी माहिती शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. बारसू प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या वादावरून आज बैठक झाली. या बैठकीनंतर सामंत यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली.बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना जर काही ब्रिफिंग हवे असेल, तर त्यांची वेळ घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्यात. जिल्हाधिकारी आजच त्यांच्यांशी बोलतील. आयुक्त बोलतील, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
उदय सामंत म्हणाले की, प्रशासनाने चार पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन आणि पोलिस विभाग 353 सारखी गुन्हे लावेल, अशी शंका आंदोलनकर्त्यांना होती. हे गुन्हे लावणार नाही, याची खात्री आम्ही आजच्या बैठकीत दिली. त्या भागात काही अधिकाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्याची माहिती खासदारांनी दिली होती. आंदोलनकर्त्यांनीही सांगितले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी नेमली आहे. उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणाबाहेर येथे जमीन घेतलेली असेल, तर ती कशा प्रकारे घेतली? का घेतली? याची दोन दिवसांत चौकशी होईल. जर या ठिकाणी बेकायदेशीर जमीन घेतली असेल, तर त्यांना निलंबित करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल, हा निर्णय आजच्या बैठकीत घेतला.
उदय सामंत म्हणाले की, महावितरणच्या ज्या अधिकाऱ्याच्या नावावर ही जमीन खरेदी केली आहे, त्या अधिकाऱ्याची तातडीने हेडक्वॉर्टरला बदली करण्याचा निर्णय पालकमंत्री या नात्याने मी घेतला आहे. आता शासनाने पाऊल पुढे टाकलेले आहे. विनायक राऊत यांचे पदाधिकारी, अजित यशवंतराव हे बैठकीला उपस्थित होते. त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधला.
उदय सामंत म्हणाले की, येत्या दोन किंवा तीन तारखेला एक विस्तारित बैठक मुंबईत घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. मुख्यमंत्र्यांशीही काल बोललो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी यांना जर काही ब्रिफिंग हवे असेल, तर त्यांची वेळ घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी आजच त्यांच्यांशी बोलतील. आयुक्त बोलतील. आजपर्यंत जी काही दडपशाही झाले, असे ते म्हणत आहेत, त्याचे स्पष्टीकरणही आमचे अधिकारी त्यांना देतील.
उदय सामंत म्हणाले की, शरद पवारांना स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी ब्रिफिंग केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनाही ब्रिफिंग केले आहे. अजून अन्य पक्षाचे काही नेते असतील, तर त्यांच्या शंका दूर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कुठेही टोकाची भूमिका घेतलेली नाही. तुम्ही तिथल्या प्रकल्पग्रस्तांना समजवावे. आम्ही समन्यवयाचा प्रयत्न करू, असे विनायक राऊत म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले की, बारसूच्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. आपण जिथे बोअरवेल मारत आहोत, तिथे काँक्रिट टाकून पिलर करणार आहोत, असाही गैरसमज पसरवला जात आहेत. मात्र, कुठलेही सर्वेक्षण इथे होत नाही. हे फक्त मातीचे परीक्षण आहे. ते आठ-पंधरा दिवसांत होईल. जगातल्या सर्वात मोठ्या लॅबने इथे प्रकल्प होऊ शकतो, असे सांगितले तरच इथे प्रकल्प होईल याचा उल्लेख त्यांनी केला.