मुंबई-अजितदादांची भाजपच्या अंधभक्तात गणना होऊ नये, असा टोला आज खासदार संजय राऊत यांनी लगावला .भाजप ईव्हीएमच्या आधारे निवडणुका जिंकतो, असा आरोप सातत्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमचे समर्थन करत संजय राऊतांच्या भूमिकेला छेद दिला आहे. ईव्हीएम मशीनचा गैरवापर होतो तर दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाची सरकारे कशी आली? असा सवालच अजित पवार यांनी केला. त्यावर अजितदादांना हा टोला संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला आहे .
संजय राऊत म्हणाले, ईव्हीएमवर केवळ भाजपच्या अंधभक्तांचा विश्वास आहे. देशातील जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही. अजित दादांची गणनाही भाजपच्या अंधभक्तात होऊ नये, अशी आशा आहे. यापुढे ईव्हीएमशिवाय निवडणुका घ्याव्यात. म्हणजे खरे जनमत कळेल. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यावरुन देशातील जनता सध्या त्रस्त आहेत.
एखाद्याने देशापासून गद्दारी केली असो की पक्षापासून गद्दारी केली असो. अशा गद्दारांचे रस्त्यावर कपडे काढून त्यांना चोप दिला पाहीजे, असे बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते. एकनाथ शिंदेंसह 40 गद्दारांनाही आपल्याला मारहाण होईल का?, अशी भीती आहे. त्यामुळेच त्यांना ऐवढी सुरक्षा दिली जात आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, अयोध्येत एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या वारसाबद्दल बोलले. खरे तर त्यांना आता बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. एकनाथ शिंदेंनी आपल्या वडिलांच्या वारसाबद्दल बोलले पाहीजे. गद्दारांना रस्त्यात पकडून मारा, असे बाळासाहेबांचे विचार होते. आम्ही त्यांच्या या विचारांचे पालन करायचे का?, हे एकनाथ शिंदेंनी सांगावे.
संजय राऊत म्हणाले, खरे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या या विचारांचे पालन करु शकतात याची भीती एकनाथ शिंदेंसह 40 गद्दारांना आहे. कोणीतरी आपल्याला मारहाण करेल, अशी भीती गद्दारांना असल्यानेच एखाद्या राष्ट्रभक्तालाही जेवढी सुरक्षा दिली जात नाही, तेवढी सुरक्षा गद्दारांना दिली जात आहे. शिंदे गटाच्या मनात ही भीती बसली आहे.
दर्शनापेक्षा शक्तिप्रदर्शन जास्त
एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, संजय राऊत यांचा दौरा अयोध्या दर्शनापेक्षा शक्तीप्रदर्शनाचा जास्त होता. खरे तर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना अयोध्येस जाण्याची गरज नव्हती. ते ठाण्याच्या एखाद्या चौकातही शक्तिप्रदर्शन करू शकले असते. अयोध्येला जाताना एकनाथ शिंदे यांच्या विमानात गुंड, मवाली, खंडणीखोर बसले होते. अशा लोकांना पवित्र करण्यासाठी त्यांना शरयू नदीत बुडवायला नेले होते का?
संजय राऊत म्हणाले, राज्यातील अवकाळीमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहे. पण अवघे महाराष्ट्र सरकार लखनऊमध्ये आराम करत आहेत. योगींच्या पाहुणचाराचा आनंद घेत आहेत. अवघा महाराष्ट्र गारपीटीने झोडपला असताना एकनाथ शिंदेंसह सर्व मंत्रिमंडळ दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहे. शिंदे म्हणतात मी अयोध्येतून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. हे त्यांनी आपल्या दिल्लीतील बॉसला सांगावे. शिंदे सरकारवर राज्यातील शेतकरी अत्यंत खवळलेले आहेत. खरे तर या काळात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाण्याची गरज आहे.