मुंबई- महाराष्ट्रात सरकार नसून अंडरवर्ल्डप्रमाणे राज्य चालवले जात आहे. मुंबई, ठाण्यात ज्याप्रमाणे अंडरवर्ल्डच्या टोळ्यांनी आपापला परिसर वाटून घेतला होता, त्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोळ्या राज्य चालवत आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजप आमदार राहुल कुल, मंत्री दादा भुसे यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी स्वत: ईडी, सीबीआय, मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात मी फडतूस नव्हे काडतूस आहे. त्यांनी हे काडतूस भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वापरावे. मात्र, ते आपले काडतूस केवळ राजकीय विरोधकांवर वापरत आहेत. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आपली प्रतिष्ठा गमावली आहे.
दरम्यान, भाजपचा आज स्थापना दिवस आहे. त्यावरुनही संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, देशात एकच पक्ष असावा, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा आहे. त्याला हुकुमशाही म्हणतात. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप वेगळा होता. आताचा भाजप पूर्ण वेगळा आहे. तेव्हा हुकुमशाहीविरोधात लढण्यासाठी भाजप हा जनता पक्षातही विलिन झाला होता. नंतर एक भूमिका घेऊन तो वेगळाही झाला. मात्र, आता भाजपात असलेल्या 90 टक्के लोकांचा त्या पक्षाशी काहीही संबंध नाही. बाहेरुन आलेली व वॉशिंग मशीनमध्ये धुतलेली ही सर्व फडकी आहेत.
ईडी, सीबीआयच्या गैरवापराविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, याप्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करणार आहे. आमची याचिका फेटाळली म्हणून भाजप का आनंदी होत आहे. आमची याचिका फेटाळताच भाजपचे लोक बँजो लावून का नाजत आहेत. आम्ही आता पुराव्यासह पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत.
नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. स्वार्थासाठी त्यांनी स्वत:च्या आईला बदलले. अशा गद्दार लोकांना भाजप आता मांडीवर घेत आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांची समाजात, राजकारणात प्रतिष्ठा काय? देवेंद्र फडणवीस यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे.