पुणे- महापालिकेत सध्या लोकशाही आहे कि नाही ? या प्रश्नाचे उत्तर या शहरातील नागरिकांनीच आपापल्या मनाला विचारावे .पण येथे एक हाथी प्रशासकाची राजवट मात्र असल्याची नोंद इतिहासात राहणार आहे. विक्रम कुमार महापालिकेचे आयुक्त आहेत तेच आता येथे प्रशासक आहेत ,तेच अर्थसंकल्प तयार करतात तेच मान्यता देतात , तेच स्थायी समितीत विषय आणतात तेच मंजूर करतात , तेच मुख्य सभाही चालवितात आणि तेच तेथे हवे ते विषय मंजूर करतात ,अर्थात हे सारे ते त्यांच्याच देखभालीखाली करतात हे विशेष .. एवढे असताना अर्थसंकल्प देखील तेच करतात आणि तेच मंजूरही करतात .पुण्यात असा कारभार असताना आत्ताशी कुठे कोणीतरी आवाज टाकला होता कायद्याप्रमाणे मुख्य सभा जनतेसाठी खुली करा .. आणि आत्ता कुठे एका माजी नगरसेवकाने ,म्हणजेच माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी देखील संतप्त सवाल केला आहे, जर आमच्या भागासाठी अर्थसंकल्पातच एक रुपयाची देखील तरतूद करत नसाल तर आम्ही कर कशासाठी भरायचा ? असा स्पष्ट सवाल करणारे पत्र डॉ. धेंडे यांनी विक्रमकुमार यांना दिले आहे.
या पत्रात धेंडे म्हणतात कि ,’जुना प्रभाग २ मधील नागपूर चाळ हौसिंग बोर्ड ,तसेच जुना प्रभाग ३ मधील त्रिदल नगर ,शांती रक्षक ,व पार्क आयलैंड सोसायटी आता प्रभाग ७ मध्ये समाविष्ट केली आहे.या भागाला १ रुपयाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.अंदाजपत्रक करताना नागरिकांनी सुचविलेली कामे आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून सुरु असलेली कामे यांचा समावेश जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जर आमच्या याभागावर महापालिका १ रुपया देखील खर्च करणार नसेल तर यंदा आम्ही कर तरी का भरावा? असा प्रश्न त्यांनी आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रातून केला आहे.