पुणे, १९ ऑक्टोबर : श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिरातून जागतिक शांतता सर्वदूर पसरेल. येथे येणार्या प्रत्येक भक्ताला शांततेची अनुभूती मिळेल. असे विचार थोर विचारवंत, आध्यात्मिक गुरू परमपूज्य श्री श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, भारत आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांनी बद्रीनाथ येथील माणा गाव येथे बांधलेल्या माता श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा कलशारोहण समारंभ मंगळवारी आध्यात्मिक गुरू परमपूज्य श्री कृष्ण कर्वे गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर तेथे महायज्ञ, महापूजा, भजनपूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, श्रीमती उषा विश्वनाथ कराड, ज्योती कराड ढाकणे, स्वाती कराड चाटे, पूनम नागरगोजे, राजेश कराड, डॉ.एस.एन.पठाण, ह.भ.प.हांडे महाराज, डॉ.मिलिंद पांडे, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ.महेश थोरवे व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती नांदेल” या स्वामी विवेकानंदांच्या वचनावर नितांत श्रध्दा व निष्ठा ठेवून सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत माता सरस्वतीच्या मंदिराच्या उभारणीमुळे माणा गावाचा आणि परिसराचा विकास तर होणार आहेच, पण या गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर पडेल व भारतातच नव्हे तर जगभरात त्याची कीर्ति पसरेल.
भारतातील धार्मिक तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याची मोहीम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहेत. पंतप्रधानांची ही संकल्पना पुढे नेत या मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने पार पडले. त्याअंतर्गत आज कलशारोहण कार्यक्रमाची सांगता झाली.
गेल्याचवर्षी या सुंदर श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते. त्यानंतर आठवडाभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे, बद्रीनाथधामचे अध्यक्ष व पदाधिकारी व सर्व सन्माननीय पंचायत सदस्य व माणा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.