पुणे:“बदलत्या काळानुसार विद्यापीठांनी आपली शैक्षणिक भूमिका बदलून वैश्विक शिक्षण देण्याची जबाबदारी स्विकारावी. त्यासाठी योग्य नियोजन आणि आराखडा तयार करावा. जेणे करुन विद्यार्थ्यांना ज्ञान, संशोधन, नवनर्मिती, प्रकल्प, नव्या कल्पनांच्या माध्यमातून सामाजिक विकास साधता येईल.”असे विचार हनी बी नेटवर्कचे संस्थापक प्रा.अनिल गुप्ता यांनी व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, युनाइटेड नेशन आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय ऑनलाईन दोन दिवसीय कुलगुरूंची परिषद २०२१-२२ (तखउए उकअछउएङङजठडफ चएएढ २०२१-२२)च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एआययूचे अध्यक्ष व चेन्नई येथील अमेटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू कर्नल डॉ.जी. थिरूवसगम, महासचिव श्रीमती डॉ.पंकज मित्तल, महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे हे उपस्थित होते.
प्रा.अनिल गुप्ता म्हणाले,“नवकल्पना ही प्रगतीचे लक्षण असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना उंच भरारी घेता येते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देणे हे देशच्या विकासासाठी महत्वाचे असते. विद्यार्थ्यांचे प्रकल्प आणि संशोधन हे नाविण्यपूर्ण असावे. वेगवेगळ्या भाषेतील संशोधनांना संग्रहित करुन त्याचा उपयोग लोककल्याणासाठी करावा. विद्यार्थ्यांनी कौशल्यांना अद्यावत करुन जास्तीत जास्त भाषेचे ज्ञान अवगत करावे.”
तसेच, विद्यापीठांनी पाण्याची आवश्यकता ओळखून त्यासाठी वेगळे आर्थिक नियोजन करावे. पाण्याचा पुर्नवापर कसा करता येईल यावर संशोधन करावे. कोविड १९ नंतर अध्ययन क्षेत्राची मोठी हानी झाली. देशातील कित्येक खेड्यातील विद्यार्थ्यांनाकडे स्मार्ट फोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. घरो घरी ज्ञान गंगा पोहोचविण्यासाठी आपण कमी पडलो हे सत्य स्विकारावे. आता विद्यापीठांनी आपली भूमिका बदलून रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे नियोजन आखावे.”
कर्नल डॉ.जी. थिरूवसगम म्हणाले,“वातावरण बदल, गरीबी, भुक यासारख्या गोष्टी या शाश्वत विकासाच्या उद्दीष्टापुढील मोठे आव्हान असणार आहेत. समाजाला सदृढ जीवन आणि शांती स्थापन करणे ही सध्याच्या शिक्षणापुढील उद्दीष्ट्ये असावयास हवे. तांत्रिक कौशल्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे. त्यामध्ये मानवी मूल्य आणि शांतीचा समावेश अभ्यासक्रमात असायला हवा. देशातील हजारो विद्यापीठांनी रोजगारक्षम शिक्षण दयावे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ जगातील सर्व विद्यापीठांनी एकत्रित येऊन ग्लोबल मॅनेजिंग कॉन्सीलची स्थापना करणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणात संशोधन व नवनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. समाजाला उपयोग होईल असे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही विद्यापीठाची जवाबदारी आहे. ज्ञान आणि विज्ञानाच्या समन्वय होऊन समाजामध्ये सुख, समाधान आणि शांती नांदेल. त्याकरीता मुल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यास सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडेल.”
डॉ. अभय वाघ म्हणाले,“ देशाला विकासाचा आकार देण्यासाठी उच्च शिक्षण खूप महत्वाचे आहे. वर्तमान काळात मातृभाषेतून शिक्षण देण्याची नवी पद्धत सुरू केल्यानंतर त्याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी पॉलिटेक्नीकमध्ये १८० कॉलेजने सहभाग दर्शविला आहे. यामध्ये संशोधनाला अधिक प्रतिसाद देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तसेच सामाजिक, आर्थिक व पर्यावरण गोष्टीवर अधिक भर दयावा. विद्यापीठांनी आधुनिक काळात डिजिटल, व्होकेशनल, संशोधन, भाषा आणि कला यावर भर दयावा.”
श्रीमती डॉ. पंकज मित्तल म्हणाल्या,“उच्च शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे उद्दीष्टये पूर्ण करण्यासाठी औद्योगिकरण, रोजगार निर्मिती, शांतता, भागिदारी आणि समृद्धीला चालना द्यावी. या करीता ही कुलगुरूंची दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. याचा उपयोग विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना होईल.”
राहुल विश्वनाथ कराड यांनी आपले विचार मांडले.
या परिषदेला महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी या दिलेला संदेश डॉ. अभय वाघ यांनी वाचून दाखविला.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.