पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊनमुळे अनेकांना उदरनिवार्हासाठी देखील बाहेर पडता येत नाही. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने अन्नपूर्णा रथ हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. गोरगरीब, मजूर,रस्त्यावर राहून उपजीविका करणारे, तसेच हातावर पोट असणा-यांची संख्या पुण्यात मोठी आहे. त्यांना दररोज भोजनाची व्यवस्था विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केली जात आहे.
विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग मंत्री तुषार कुलकर्णी, कृष्णकांत चांडक, हर्षद नातू, अनंत शिंदे, राजेश जाधव, नाना क्षीरसागर, प्रतिक गोरे, अमित चिटणीस, संजीवनी चौधरी, कमलेश तिवारी आदी कार्यकर्ते या उपक्रमात सहकार्य करीत आहेत. मागील वषीर्देखील विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होते. त्यावेळी २० हजारांपेक्षा जास्त लोकांना भोजन देण्यात आले होते.
तुषार कुलकर्णी म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात अनेकांना दोन वेळचे जेवण देखील मिळणे अवघड होते. अशांसाठी अन्नपूर्णा रथाच्या माध्यमातून भोजन देण्यात येत आहे. कमला नेहरू हॉस्पिटलपासून भोजन किट वाटपाची सुरुवात झाली.
ते पुढे म्हणाले, पर्वती पायथ्याच्या मागील आंबेडकर वसाहत, कोथरूडमधील गोसावीवस्ती, उत्तमनगर, रामनगर येथे सध्या भोजन वाटप सुरू आहे. यापुढे जिथे गरज आहे त्या ठिकाणी वाटप करण्यात येईल. लॉकडाऊन संपल्यानंतरही सुमारे २ महिने हे भोजन वाटप सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.