पुणे- ना गिरीश बापट नेता ,ना संजय काकडे नेता ,ना अनिल शिरोळे नेता .. यांचं ऐकतंय तरी कोण ? पुण्याच्या प्रत्येक समस्या घेऊन येथील लोकप्रतिनिधींना थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घ्यावी लागते .आणि बरं तिथे जाऊन हि त्यांच्या पदरात काय पडतंय तर .. फेकमफाक ? … मुख्यमंत्री अशा तक्रारदारांपुढे अधिकाऱ्यांना आदेश देतात आणि तक्रारदार खुशीत माघारी येतात …पण पुढे त्यांच्या लक्षात येते .. प्रत्यक्षात कृती काही झाली नाही ,परिस्थितीत फरक काही पडला नाही …आश्वासन ..तेही मुख्यमंत्र्याचे मिळाले खरे..पण ..एकदा, दोनदा असे प्रकार आता ३ /३ वेळा हि घडले आहेत.उदाहरणच द्यायचे झाले तर पाणीकपातीचा विषय आहे …पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पाणी कपातीवर आजपर्यंत तीन वेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे .आणि त्यांनी हि त्यांच्यासमोर जलसंपदाला त्या त्या वेळी तसे तसे आदेश दिले आहेत . …पुण्यातील हेल्मेट सक्ती चा विषय तर आता त्याहून अधिक लोकांच्या मानगुटीवर बसला आहे.पोलीसआयुक्त पदी बसलेल्या माणसाला हा कायदा राबविण्याची खामखूमी अधून मधून कायम येत आली आहे ..आणि हि खामखूमी १०० कोटीचा हेल्मेट चा धंदा करून गेली आहे …म्हणजेच आता पाणी कपात असो ,हेल्मेट सक्ती असो किंवा यासारख्या अन्य गोष्टी म्हणजे पुणेकरांची मुख्यमंत्र्यांनी चालविलेली ‘बनवाबनवी ‘वाटावी अशाच हालचाली पुण्याच्या राजकारणात घडलेल्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत. पुण्यातील लोकप्रतिनिधींचे प्रशासनातील ‘अडेलतट्टू’ ऐकत नाहीत हि तक्रार आम्ही अनेकदा ऐकली आहे . पण आता हे ‘अडेलतट्टू’ सीएम च्या आदेशाला देखील फाट्यावर मारतात काय ? कि मुख्यमंत्रीच बनवाबनवी करतात ? असे दोन प्रश्न या निमित्ताने उभे राहिले आहेत .आणि त्यामुळे पुण्याशी प्रत्यक्षात काहीही संबध नसताना पुण्याचं नेतृत्व स्वतः च्या हाती बळकावून बसलेल्या मुख्यमंत्र्यांविषयी ‘रोष ‘ वाटला तर नवल वाटणार नाही . ते चतुर आहेत ,मुरब्बी राजकारणी आहेत हे सारे त्यांच्या राजकारणापुरते ठीक आहे ,पण जेव्हा घराघरात तुम्ही मोजून मापून, पैसे उकळून, पाणी द्यायचे स्वप्न साकार करण्याच्या हालचाली सुरु कराल , वेळोवेळी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पोलिसांना पुणेकरांकडून ‘वसूली’ चे आदेश सोडाल .. म्हणजे थेट पुणेकरांच्या खिशात जेव्हा तुम्ही जबरदस्तीने हात घालाल ,तेव्हा साहजिक आहे ..तुम्ही मुख्यमंत्रीच ,काय .. कोणी ही असा ..तुमच्याबद्दल ‘रोष ‘ निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही .
खरे तर, मुख्यमंत्र्यांविषयी पुणेकरांच्या फार चांगल्या भावना होत्या . राज्याला हुशार मुख्यमंत्री भेटल्याचा दाखला अनेक जण देऊ लागले होते . पण या साऱ्या भावनांचा आता चक्काचूर होताना दिसत आहे .
त्यांनी सर्वप्रथम जर रोष घेतला असेल तर तो येथील त्यांच्याच पक्षातील स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा …त्यांनी पुण्याचं नेतृत्व पुण्याला दिलं नाहीच कधी …ते नागपूरकर असलेल्या स्वतः कडेच ठेवलं.. काय ,या मागे त्यांची गणितं होती त्यांनाच ठाऊक … पण एकंदरीतच सुरेश कलमाडी नंतर पुण्याला खमक्या नेता मिळाला नाही हे पुणेकरांच आणि इथल्या तमाम राजकीय वर्तुळाचं दुर्दैव म्हणावं लागेल . पुण्याचा प्रश्न कलमाडींच्या पातळीवरच सुटायचा .. त्यासाठी कधी मुंबई ,दिल्लीला जाव लागायचं नाही. कलमाडींचे एवढे वर्चस्व होते कि पोलीस कमिशनर ,महापालिका आयुक्त ..असे जे आधिकारी ,थेट जनतेच्या घरापर्यंत पोहोचणारे निर्णय घेऊ शकतात त्या अधिकाऱ्यांची हिम्मत नव्हती कलमाडींचे आदेश न पाळण्याची …(केवळ अरुण भाटीया याला अपवाद होते )
पण आता मुख्यमंत्र्यांचे आदेश हि निरर्थक ठरत आहेत ,कि मुख्यमंत्री यांनीच पुण्यात आपले ‘तट्टू’ असलेले अधिकारी बसवून ..’हा खेळ येथील प्रतिनिधी आणि जन् भाव् नेशी चालविला आहे अशा प्र् शांनी आता कार्यकर्त्यांच्या मनात थैमान घातले आहे .
कलमाडी काय होते, तो विषय येथे नाही , त्यांच्या अनेक चुका झाल्यात ..त्यांच्या भोवती देखील ‘सावली’ सारखेच कार्यकर्ते होते, जे त्यांच्या उजेडात म्हणजे कारकिर्दीत त्यांच्यासमवेत राहून स्व तिजोऱ्या भरत होते .. आणि आता त्यांच्या काळात अंधार पडला कि त्यांनी अशा ‘सावली ‘कार्यकर्त्यांनी ‘समजूतदारपणा दाखवीत अन्य पक्षात किंवा आपापला मोर्चा अन्यत्र वळविला . कलमाडींना हि माणसे कधी ओळखता आली नाहीत . कलमाडींनी पुण्यात बालेवाडी स्टेडीयम ,गणेश कला क्रीडा मंच ,सातारा रस्त्याचे रुंदीकरण , काही उड्डाणपूल अशी काही कामे केलीत .स्काय बस आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो फसला.
गाडगीळांना घरी बसवून ज्या शरद पवारांनी कलमाडींच्या हाती पुणं सोपविलं तेव्हा कलमाडी हा बाहेरचा, हे पुणेकर नाही, असा आरोप झाला होताच ..पण आपल्या राजकीय कौशल्यावर कलमाडींनी, सारे काही शांत केले .पुढे त्यांच्या संघटन कौशल्याने सोनिया गांधींशी खूप जवळीक साधली होती .आणि महाराष्ट्रात केवळ पवारच नाहीत, तर कलमाडी नावाचा खंबीर नेता आहे याचा प्रचार उद्योगजगत व दिल्लीत आणि परदेशातही होऊ लागला . आणि तेव्हा पवारांच्या पक्षाशी कलमाडीचा दुरावा वाढत गेला . पुण्यात शेकडो करोडो रुपये खर्च करून त्यांनी बीआरटी आणली, तेव्हा त्यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविली, या बीआरटी वर तेव्हाच सुरुवातीला केवळ आमच्यासारख्याच माध्यमातून आरोपांच्या फैरी झडू लागल्या . आणि शेवटी बीआरटी फेल गेली,बोनाला सारख्या अधिकाऱ्याच्या नादाला लागून ,धज्जा उडाला बीआरटी चा , आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला महापालिकेतील निवडणुकीत झाला, पण, सत्तेसाठी कलमाडींच्या बंगल्यावरच अजित पवारांना सपत्नीक भोजनासाठी जावं लागलं, आणि महापलिकेत सत्ता हाती घ्यावी लागली. कलमाडींचं दुदैव इथे थांबले नाही. दिल्लीतील कॉंग्रेसच्या ज्या महिला नेत्यावर (सोनिया नव्हे ) विसंबून राहिल्याने राष्ट्रकुल घोटाळ्यात ते अडकले .पुण्यात कलमाडी सारखा नेता गेला ,आणि दिल्लीतील सत्ता हि गेली ..कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील अधपतनाला कॉंग्रेसचे श्रेश्ठीच जबाबदार होते असे म्हणायला आणखी हि अशीच अनेक कारणे आहेत . शंकरराव चव्हाण होते तोपर्यंत वेगळी गोष्ट होती. पण त्यानंतर कॉंग्रेसचे बहुतांश नेते हे कॉंग्रेसच पेक्षा पवारांच्या दावणीलाच अधिक बांधलेले होते .पण कलमाडींच्या अस्तानंतर कलमाडींचे ‘सावली’ सारखे कार्यकर्ते गायब झाले .पण कट्टर कार्यकर्ते ,कवच कुंडले म्हणता येतील अशा कार्यकर्त्यांना गोवण्याचे प्रयत्न सुरु झाले .
खरे तर कलमाडी नावाच्या, धनशक्तीच्या जोरावर निर्माण झालेल्या, पुण्यातील खमक्या नेत्याचा इतिहास इथे मांडायचा नाही पण तसा खमका नेता पुण्याला नंतर लाभलाच नाही हे मात्र नमूद करावेच लागेल. कलमाडीच्या अनेक सुरस कथा आजही राजकीय वर्तुळात मोठ्या चवीने मांडल्या जातात. आता खासदारकी साठी इच्छुक असलेल्या पैकी तर काहीजणांनी कलमाडींच्या फिजिकली लाथा हि खालेल्ल्या बातम्या त्या त्या काळात प्रसिध्द झालेल्या आहेत .क्रीडा च्या माध्यामतून मान्यवर प्रसिद्धी माध्यमांत त्यांची माणसं चांगल्या हुद्द्यावर त्यांनी बसवली होती,त्यामुळे त्यावर त्यांचा दबदबा होताच. आपला कार्यकर्ताच काय विरोधक काय आणि अधिकारी काय कलमाडी ने सारेच आपल्या दावणीला घट्ट बांधले होते .पण हा सारा त्यांच्या ‘उजेडात ‘ला काळ झाला .
आता सध्या काय ….
आता पुण्याला नेताच उरला नाही पुण्याच्या या नेतृत्वाच्या अशा अस्ताने पुढे यायला कोणी धजावला नाही काय? तर काही काळ नाही असेच उत्तर येईल पण अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज बाबांच्या काळात इथे सामुहीक नेतृत्वाचा घंटानाद केला गेला. ज्याला 2 कार्यकर्त्यांना चहा पाजता येत नाही अशांना आमदारकी बहाल केली गेली.पतंगराव कदमांसारख्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न उराशी घेवूनच निरोप घ्यावा लागला तर सामान्य कार्यकर्ता सोडून सलमान खान आणि रंगीत तारे तारकांच्या समवेत रमणाऱ्या हाय फाय विश्वजित कदमाला इथली लोकसभेची उमेदवारी दिली गेली आणि पुढे इथली कॉंग्रेस हळू हळू लयास गेली.
आता सातत्याने जनसामान्यात संपर्क राहिलेला , कधी काळी कलमाडीची कवच कुंडले बनलेला दीपक मानकर असेल संजय काकडे सारखा उद्योग क्षेत्रातील नवा नेता असेल अशी खमकी मंडळी आता पुण्यात नेतृत्वाच्या दिशेने पावले टाकताहेत . पण या साऱ्यांना अडथळे आहेत … ते अर्थात कुणाचे ..ते वारंवार इथे लिहायला नकोत .नागपूरकर अतिचणाक्ष आहेत. ते पुण्यात राहणाऱ्या नेत्याच्या हाती सर्वोसार्वी पुण्याचं नेतृत्व द्यायला का तयार होत नाहीत .तर यामागे एकच कारण आहे . जर पुण्याचं नेतृत्व कलमाडी सारखं खमकं निघालं तर मुख्यमंत्र्यांला हि पुण्याच्या नेतृत्वाच्या निर्णयात ढवळाढवळ करता येत नाही .हेच असाव …
येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आता पुढे काय होईल, ते ठरवेल ..पुण्याला नेता मिळेल कि पुणं असंच कोणाच्या तरी पुण्याबाहेरच्या नेत्याच्या(गूढ छायेच्या ) इशाऱ्यावर हेलकावत राहील, ते या निवडणुकांचा कौलच सांगणार आहे .