पुणे, दि. ११ डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुपारी १२.०० वाजता वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील वारकर्यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. यावेळी विश्वरुप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, प्रा.स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. मिलिंद पांडे व योगगुरू पाडेकर गुरूजी हे उपस्थित होते.
या सप्ताहात हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी, हभप हरिहर महाराज दिवेगांवकर, हभप रामराव महाराज ढोक, हभप यशोधन महाराज साखरे व हभप चिन्मय महाराज सातारकर यासारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा सादर केली. तसेच, प्रियंका ढेरंगे चौधरी, गायिका अपर्णा संत, ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके, पं. शौनक अभिषेकी व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
ह.भ.प.श्री.बापूसाहेब मोरे-देहूकर म्हणाले,” दुष्काळ पडला तर जनावरे मरतात. मोठा दुष्काळ पडला माणसे व जनावरे मरतात आणि चांगल्या संस्कारांचा व विचारांचा दुष्काळ पडला तर संपूर्ण मानवता मरते. त्यामुळे संताच्या वचनाचे महत्व सृष्टीवर अधिक आहे. संत हे जग वात्सल्य असतात म्हणून संताची महिमा ही शब्दात सांगता येत नाही. संत हे स्वतःच्या दुखांना विराम देऊन दुसर्यांचे दुख सावरण्यास पुढे येतात. त्यांना सुख व शांतीचा मार्ग दाखवितात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रुजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता व निकोप, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृती याद्वारे विज्ञान व अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थक्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतांनी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.”
शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.