मुंबई, दि. 16 :- बा पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं शेकडो किलोमीटर पायी चालून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचलेल्या वारकरी माऊलींच्या तसंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केलं असून “राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे, शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची सुबत्ता येऊदे, राज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊदे, समाजातली एकजूट, बंधुत्वाची भावना कायम राहूदे, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे,” असं साकडंही त्यांनी बा पांडुरंगाला घातलं.
आषाढी एकादशीनिमित्तानं जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची आध्यात्मिक, भक्तीपरंपरा आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या वारकरी माऊलींना एकत्र आणणारी, स्त्री-पुरुष समानतेचं दर्शन घडवणारी, महाराष्ट्राच्या मातीला एकता, समता, बंधुतेचा विचार देणारी, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची, आषाढीवारीची पताका अशीच डौलानं उंच फडकत राहूदे.