राहुल गांधी यांचा नेतृत्व आम्हाला मान्य
मुंबई-नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींसोबत जातील असे मला वाटत नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे, त्यांचे नाक कापले गेले आहे आणि असा नाक कापलेला पंतप्रधान आम्हाला नको, असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते.राहुल गांधी पंतप्रधान पद स्वीकारण्यास तयार असतील तर आमचा काहीही आक्षेप नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
या देशात लोकतंत्र हवे की हुकूमशाही हवी, हे नितीश कुमार यांनी ठरवायचे आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे यांनी कायमच हुकुमशाही विरोधात संघर्ष केला आहे. चंद्रबाबू नायडू तर हुकूमशाही विरुद्ध स्वतः जेलमध्ये देखील गेले होते. त्यामुळे आता देशामध्ये हुकूमशाही हवी की लोकशाही हवी, याचा निर्णय चंद्रबाबू नायडू घेतील, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे त्यांच्यासोबत जातील असे मला वाटत नाही. आणि त्यांच्या शिवाय भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
अमोल कीर्तिकर यांचा विजय चोरण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. चोरी करून आणि पाकीट मारी करून रवींद्र वायकर यांना जिंकवण्यात आले असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. या मतदारसंघांमध्ये फेर मतमोजणीच्या माध्यमातून रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील एकंदरीत निकालावर संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नरेंद्र मोदी आता ब्रँड राहिला नाही, आता त्यांची ब्रँडी झाली आहे. अशा शब्दात संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. आता भाजपचे सरकार आलेले नाही. कालपर्यंत ते मोदी सरकार येणार असा दावा करत होते. मात्र, आता एनडीएचे सरकार अशी भाषा नरेंद्र मोदी यांच्या तोंडून निघत आहे. आमच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पराभव मान्य करावा, असे देखील आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. तुम्ही देव नसून मनुष्य आहात हे आधी मान्य करा, या भारताच्या जनतेने तुमचा पराभव केला असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. राहुल गांधी यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी देशाचे नेते असल्याचा सिद्ध केले आहे. त्यांचे नेतृत्व त्यांनी सिद्ध केले असून ते देशाचा पंतप्रधान पद स्वीकारण्यास तयार असतील तर आमचा काहीही आक्षेप नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीमध्ये देशाचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.