भाजपमध्ये सत्तास्थापनेवर विचारमंथन सुुरू झाले आहे. 543 जागांच्या लोकसभेत 33 जागा कमी पडल्या आहेत. दरम्यान, 16 जागा जिंकणारे चंद्राबाबू नायडू आणि 12 जागा जिंकणारे नितीशकुमार किंगमेकर ठरले आहेत. या मित्रपक्षांच्या साथीने भाजप सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार आहे. मोदी मंगळवारी रात्री ८ वाजता भाजप मुख्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मोदी यांनी खासकरुन ओडिशाचा उल्लेख केला. तिथे भाजपने बिजदचा धुव्वा उडवून 21 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. इकडे,एक्झिट पोलचे दावे फोल ठरवून उत्तर प्रदेश,महाराष्ट्र व राजस्थान सारख्या राज्यातील निकालांनी चकीत केले. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने विपरित परिस्थितीत निवडणूक लढवली. त्यांनी पुन्हा अदानी-अंबानीवर हल्ला चढवला. दरम्यान, सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस चंद्राबाबू नायडू,नीतिश कुमार यांच्याशी संपर्कात असल्याचे सांगितले जाते. इकडे, नायडू म्हणाले, आंध्रच्या जनतेने आमच्या युतीवर विश्वास दर्शवून विजयाची माळ गळ्यात टाकली आहे. आम्ही एनडीएसोबत आहोत. तर जदयू नेते के.सी.त्यागी म्हणाले की, निवडणूकपूर्व काळात एनडीएला दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत.