मुंबई-डॅडी या नावाने आता समाजातील तरुण वर्गात आपली क्रेझ निर्माण केलेल्या आणि माध्यमांनी कुख्यात गुंड म्हणून वारंवार संबोधलेल्या अरूण गवळी यांच्या सुटकेला राज्य सरकारने विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृहविभागाला चार आठवड्यांमध्ये निर्णय घ्यायचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात गृहविभागाने सर्वोच्च न्यायालयात गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला विरोध केला आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीच्या आधी अरुण गवळीची सुटका झाल्यामुळे महाआघाडीच्या नेत्यांनी भाजपवर आरोप देखील केले होते. आता गृहविभागाने या विरोधात याचिका दाखल केल्यामुळे अरुण गवळी यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अरुण गवळी यांच्या कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत साथ देण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतेच येथे जाहीर केले होते. गीता गवळी या मला बहिणीप्रमाणे असून अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांच्याप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना मीही प्रेम देईन. मी आता अखिल भारतीय सेनेतील एक सदस्य झालो असल्याचे समजावे, असे वक्तव्य नार्वेकर यांनी केले होते. राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी प्रचाराचा भाग म्हणून अरुण गवळींना मानणारा वर्ग आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेला सुटल्यामुळे राहुल नार्वेकर यांची इच्छा अपूर्ण राहिली.
दक्षिण मुंबईमधील लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात अरूण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती सरकारने अरूण गवळीच्या सुटकेचा आदेश काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 2004 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने शिवसेनेच्या मोहन रावले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते आणि अरूण गवळीचे भाचे सचिन अहिरही त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी अरूण गवळीला 92 हजार मते मिळाली होती. त्यावेळी सचिन अहिर आणि अरुण गवळी यांना मिळालेल्या मतांचा आकडा हा निवडून आलेल्या सेनेच्या मोहन रावले यांच्या मतांच्या आकड्यापेक्षा जास्त होता.
डॉन अरुण गवळी 80 आणि 90 च्या दहशकात मुंबईतील भायखळा या स्लम एरियात राहून घरोघरी दूध पोहोचवण्याचे काम करत होता. पुढे आपल्या क्रुर कृत्यामुळे तो गुन्हेगारी जगताचा बादशाह झाला. आता ‘डॅडी’ या नावाने त्याची ओळख असून, तो शिवसेनेच्या नगरसेवकाच्या खुन प्रकरणात तो शिक्षा भोगत आहे. एक सामान्य कुटुंबातील मुलगा ते अंडरवर्ड डॉन असा त्याचा प्रवास आहे.
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव रोजगारासाठी मुंबईत आले होते. घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्याने अरूण गवळीला पाचवीतूनच शाळा सोडावी लागली. यानंतर वडिलांना मदत म्हणून तो घरोघरी जाऊन दूध विकण्याचा काम करू लागला. 1980 च्या दरम्यान गवळी राम नाईक गॅंगशी जोडला गेला. पुढे दाऊदसाठी तो काम करू लागला.
1993 मध्ये जेव्हा मायानगरी मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा तेव्हा अंडरवर्ल्डचे सारे समीकरण बदलून गेले होते. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईला पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगवेगळे झाले. छोटा राजनने आपला मलेशियात व्यवसाय सुरू केला. त्यामुळे अरुण गवळीला मुंबईत आपले साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला गवळीचा कारभार दगडी चाळीतून चालत असे.