अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने श्रद्धांजली सभा
पुणे : दत्ता टोळ पुणे महापालिकेत अधिकार पदावर असताना आपला फावला वेळ आणि निवृत्तीनंतरचे सारे जीवन त्यांनी बालसाहित्याला वाहिले होते, त्या अर्थाने त्यांचे जीवन म्हणजे बालसाहित्य समर्पित साहित्य जीवन होय. बालसाहित्याचे लेखक, प्रकाशक, बालसाहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि नवोदित लेखकांना मार्गदर्शन करणारे उत्साही कार्यकर्ते अशी त्यांची विविध रूपे होती, त्यांच्या निधनाने बालसाहित्याच्या चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध बालसाहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता टोळ यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, राजन लाखे, समितीचे संचालक ज. ग. फरे, डॉ. दिलीप गरुड, अनंत टोळ, अभया टोळ, मीरा शिंदे, भरत सुरसे, पं. वसंत गाडगीळ यांनीही श्रद्धांजली वाहिली.
राजन लाखे म्हणाले, दत्ता टोळ यांची कार्यशीली आम्हाला ही संस्था चालवताना मार्गदर्शक ठरेल. अमरेंद्र गाडगीळ हे दता टोळ यांचे गुरु होते. त्यांनी अमरेंद्र दत्त या नावाने ही लेखन केले आहे, असेही त्यांनी सांगितले. टोळ यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.