पुणे- महानगरपालिकेने नागरिकांचे पैसे खर्च करून सारसबाग येथील रस्ता बळकावलेल्या गब्बर स्टॉल धारकांना महानगरपालिकेच्या खर्चाने फूड प्लाझा बांधूनदेणे गैरअसून असा प्रकार महापालिकेने अजिबात करू नये , अशी मागणी माजी नगरसेवकांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आज केली आहे.पुणेकर नागरिकांच्या पैशातून ठराविक लोकांचे पुनर्वसन करू नये. आज हा पायंडा सारसबाग या ठिकाणी पडला तर उद्या अनेक ठिकाणी स्टॉलधारक एकत्र येऊन महानगरपालिकेच्या म्हणजे पर्यायाने पुणेकरांच्या पैशाने फूड प्लाझा बांधून मागतील, रस्ते रद्द करण्याची मागणी करतील. त्यामुळे याबाबत आपण जे धोरण स्वीकारले आहे त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.पुणे महानगरपालिकेच्या विकासा आराखड्यातून एखादा रस्ता रद्द करणे योग्य नाही. हा रस्ता रद्द झाल्याशिवाय हा फूड प्लाझा अस्तित्वात येऊ शकत नाही. या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांचे त्यांच्या संबंधितांचे स्टॉल आहेत. रस्ता रद्द करू नये आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या म्हणजे पर्यायाने पुणेकर नागरिकांच्या पैशातून ठराविक लोकांचे पुनर्वसन करू नये. पुणेकर जागरूक आहेत व आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून जर असे काही करण्याचा प्रयत्न केला तर मनपा विरोधात राज्य शासनाकडे आणि त्यांनीही ऐकले नाही तर हायकोर्टाकडे दाद मागावी लागेल. आपण सर्वांगीण अभ्यास करून याबाबत निर्णय करावा व चर्चेसाठी वेळ द्यावा असेही या माजी नगरसेवकांनी म्हटले आहे.
सारसबाग येथील रस्ता बळकावलेल्या गब्बर स्टॉलधारकांना महापालिकेच्या खर्चाने फूड प्लाझा बांधून देणे गैर
Date: