आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित प्रवचनाचा दुसरा दिवस
पुणे : चांगल्या विचारांच्या श्रवणाने जीवनात आध्यात्मिक विकास शक्य आहे. कानामध्ये आभूषणे घातल्याने शोभा वाढणार नाही, तर ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने कानाची शोभा वाढेल. आधुनिक युगात डिजिटल डिटॉक्स आणि नशेच्या समुद्रात अडकलेल्या तरुणाईला बाहेर काढण्याकरिता साधू- संतांची व चांगल्या विचारांची वाणी ऐकविणे आवश्यक आहे. चांगली वाणी श्रवण केल्याने नशामुक्तीची प्रेरणा मिळेल, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी वालचंद संचेती, पं. वसंतराव गाडगीळ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री महाश्रमणजी म्हणाले, मोबाईल सारख्या यंत्राचा अतिवापर होत नाही ना? हे आपण पाहायला हवे. त्याच्या वापरावर आपला संयम असणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थी देखील सध्या नशेच्या विळख्यात अडकत आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्याकरिता शाळा व महाविद्यालयांमध्ये संतांची प्रवचने व्हायला हवी.
ते पुढे म्हणाले, आपण काय ऐकले? का ऐकले? आणि कसे ऐकले पाहिजे? या तीन प्रश्नांची उत्तरे मिळाली, तर चांगली माहिती मिळून संतुष्ट होत काम करू शकतो. आजच्या युगात सामग्री खूप प्रमाणात आहे. त्यातील संतांचे विचार, भक्तीमय भजन आणि जीवनात उपयोगी पडेल असेच ऐकायला हवे. चांगली प्रेरणा देणारी वाणी आपण ऐकायला हवी. मार्गदर्शक, हितकर आणि उपयुक्त गोष्टी ऐकल्यास आपला फायदा होणार आहे.
हित संपादनासाठी आपण समोरच्या व्यक्तीचे देखील ऐकायला हवे. त्यातून ऐकणाऱ्या आणि सांगणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींचे हित होईल. आर्ट ऑफ हिअरिंग ही देखील एक कला आहे. एखाद्या प्रवचन किंवा व्याख्यानात वक्त्यांनी सांगितलेले विचार मनापासून ऐकल्यास एखादा श्रोता देखील पुढे जाऊन चांगला वक्ता होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक २ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती आयोजनात सहभागी झाले आहे.