मुंबई-काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत. प्रियांका गांधी या शनिवारीच मुंबईत दाखल झाल्या. त्यांनी राहुल गांधी यांच्यासह चैत्य भूमीला भेट देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन, आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची ही पहिलीच सभा आहे.
दरम्यान, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ‘न्याय संकल्प’ पदयात्रा देखील काढण्यात आली आहे.या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार सतेज पाटील, वर्षा गायकवाड व सचिन सावंत यांनी शनिवारी शिवाजी पार्कला भेट देऊन सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मैदानात 13 एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.