राज्य सरकारची घोषणा; काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या लढ्याला यश
पुणे : महाराष्ट्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या काँग्रेसचे आमदार श्री. रवींद्र धंगेकर यांच्या मागणीला यश आले असून याबाबतची अधिकृत घोषणा राज्य सरकारने केली आहे. यामुळे पुणे शहरासह राज्यभरातील असंख्य रिक्षाचालक व मालकानी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे आमदार श्री. रवींद्र धंगेकर यांचे आभार मानले.
महाराष्ट्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन यासाठी आमदार श्री. रवींद्र धंगेकर हे सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर मंत्री मंडळाच्या शनिवारी (ता. 16) झालेल्या बैठकीत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे सरकारची १० वर्षांपूर्वीची घोषणा आमदार श्री. रवींद्र धंगेकर यांची प्रयत्नांमुळे पूर्णत्वास आली आहे.
रिक्षा चालकांच्या रखडलेल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर रवींद्र धंगेकर हे आमदार झाल्यापासून सातत्याने आवाज उठवत आहेत. ३ ऑगस्ट २०२३ रोजी पावसाळी अशी अधिवेशनात त्यांनी हा विषय मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर १८ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा हा विषय उचलून धरला. याच पार्श्वभूमीवर, अधिवेशनप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना ‘महाराष्ट्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे’, असे पत्र दिले. या पत्राची त्यांनी तातडीने दखल घेतली व ‘या पत्रावर त्वरित प्रस्ताव सादर करा’, अशा सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तरतूद तुटपुंजी; संघर्ष कायम राहील
रवींद्र धंगेकर यांच्या या सततच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्याची घोषणा सरकारने आज केली. मात्र, यासाठी केवळ ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ती पुरेशी नाही. ही तरतूद आणखी वाढवावी, रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी आरोग्य शिबीर व्हावेत, त्यांचा आरोग्य विमा काढला जावा, त्यांना पेन्शन मिळावी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क माफ व्हावे… या प्रश्नांसाठी माझा संघर्ष सुरूच राहील, असे रवींद्र धंगेकर यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.