कोल्हापूर-आमच्या कुटुंबात हे जे काही झालं.. त्यांनी माणसं फोडली.. एकेक माणसं जायला लागली. जेव्हा आमचं घर फोडलं, तेव्हा मला अत्यंत वाईट वाटलं. मी दिवसभर रडत होते. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मला वाटलं हे काय झालं. तेव्हा मला शरदचा फोन आला. तो म्हणाला, रडतेस काय? हिंमत ठेव. तू शारदाबाईंची लेक आहेस. डोळ्यात पाणी काढायचं नाही. आपल्याला आपल्या आईनं लढायला शिकवलं आहे, रडायला नाही. हिंमत धर. तुझ्या जिवात जीव असेल तेवढं काम कर, असा अंगावर काटा आणणारा प्रसंग सरोज पाटील यांनी सांगितला.निर्भया बनो कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार गट स्वतंत्र झाला आणि सरकारमध्ये सहभागी झाला. पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील संख्याबळाच्या जोरावर अजित पवार गटाला मिळाले. या पक्षफुटीला आता सुमारे 10 महिने होत आले आहेत. तरी देखील या घटनेवर वेगवेगळ्या चर्चा घडत असतात. शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी देखील पक्ष फूटीबरोबर घर फुटल्याचे आम्हाला दु:ख असून त्या दिवशी मी दिवसभर रडत होते, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व अनुभव देखील कथन केला आहे.
सरोज पाटील म्हणाले की, मला स्वतः शरद पवार यांनी फोन करून त्यांना माहिती दिली होती. 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याचं जाहीर झालं. त्याच दिवशी त्यांच्यासह इतर 9 आमदारांचा मंत्रीपदासाठी शपथविधीही झाला. यानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या कृतीचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. पण आमच्या घरातील वातावरण आमचं आम्हालाच माहित होतं. त्या दिवशी घरातील प्रसंग त्यांनी सांगितला.
दरम्यान, सरोज पाटील शरद पवारांच्या राजीनाम्यावेळीही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 1 जून रोजी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं. त्यावेळी अजित पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत शरद पवारच पक्षाध्यक्षपदी हवेत, असा आग्रह धरला होता. त्यानंतर तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं होते. त्यावेळी सरोज पाटील देखील चांगलाच भावुक झाल्या होत्या.