पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सध्या शरद पवार गटात असलेले रोहित पवार यांच्या साखर कारखान्यावर जप्तीच्या कारवाईची नोटीस आल्यानंतर त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्ला केला.
इशारा – रोहित पवार म्हणाले ,माझ्याकडेही ८/९ फाईल्स आल्या आहेत -ज्यात भाजपच्या २ आणि अजितदादांच्या पार्टीच्या ७ नेत्यांच्या तसेच एकनाथ शिंदे यांच्या पार्टीतल्या नेत्यांच्या फाईल आहेत .मुंबई /ठाणे क्रीडा मैदाने बिल्डरच्या घशात घालणे , मनी लाँँड्रीगची फाईल आहे आणि आता अॅॅम्ब्युलांस ची फाईल माझ्याकडे आलेली आहे जो या सरकारचा मोठा घोटाळा आहे .आणि या फाइल्स सध्याच्या सरकार मधील एका हितचिंतकाने पाठविली आहे, त्याचा मी अत्यंत आभारी आहे.
रोहित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर केसेस चालू आहेत. शरद पवार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ईडीने त्यांच्या विरोधात नोटीस काढली होती. अण्णा हजारे स्वतः म्हणतात या घोटाळ्यात शरद पवारांचं नाव नसतानाही त्यांचं नाव का घेतलं, हा प्रश्न आहे. दोन-तीन महिने मला जेलमध्ये टाकलं जाईल, अशी शक्यता आहे. कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल तर अशी द्वेषपूर्ण कारवाई करणं चुकीचं आहे. भाजपमध्ये गेलं की कारवाया थांबतात, परंतु मी लढणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता कन्नड येथे जावून शेतकरी आणि माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे.
”आम्ही कोर्टात गेलो तर त्यांची कारवाई कुठेही टिकणार नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. माझं नाव आरोपींमध्ये नाही. ज्यांचं नाव आरोपींमध्ये आहे त्यातले ७० टक्के लोकं भाजप, अजित पवारांच्या गटात किंवा एकनाथ शिंदेंच्या सोबतचे आहेत. मी तर हा कारखाना महागात घेतला. ज्यांनी यापूर्वी विकत घेतला ते भाजपचे लोक आहेत. त्यांनी माझ्यापेक्षा स्वस्तात कारखाना घेतला आहे. मात्र आजपर्यंत एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. माझ्यावर केस झाली तरी मी लढणार.. कोणी किती स्वस्तात कारखाना घेतला याची यादी माझ्याकडे आहे. मी ती वाचणार नाही. कारण मी द्वेषाचं राजकारण करत नाही.” असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार पुढे म्हणाले, मला नोटीस आली, मी चौकशीला गेलो. ईडीच्या अधिकाऱ्यांचं यात काहीही चुकीचं नाही. तीनही वेळेला मी चौकशीला सामोरं गेलेलो आहे. तरीही जप्तीची कारवाई करत असतील तर चुकीचं आहे. अधिवेशनात जेव्हा मी बोलत होतो, तेव्हा माझे काही मित्र मला सांगत होते. विधानसभेत काहीही बोलू नको नाहीतर करवाई होईल. तरीही मी अधिवेशनात बोललो. आता माझा कारखाना जप्त करण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जात आहे. रोहित पवार म्हणाले की, मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पूर्ण बारामती Agro कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्यांदा केस फाईल केल्यानंतर दोन वर्षे ईडीचे अधिकारी शांत राहिले. मात्र राज्याची सत्ता जेव्हा बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला.. जेव्हा अजितदादांनी जुनाच साहेबांचा पक्ष चोरी करुन आमदारांना सोबत घेऊन बंड केलं.. त्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरु झाल्या.
काय आहे प्रकरण?
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त करण्याची नोटीस काढली आहे. कारखान्याची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जवळपास 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.