पुणे- काल येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठात मोर्चाने जाऊन कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांच्याकडे अमित राज ठाकरे अनेक मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत .त्या करतांना त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि,’
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे नाव आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ ही बिरुदावली मिरवणा-या पुणे विद्यापीठाची गेल्या काही वर्षांत ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ अशी गत झाली आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यापीठ कॅम्पस आणि विद्यापीठाशी संलग्न पुणे, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना असंख्य शैक्षणिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि साहजिकच त्यामुळे त्यांच्यात असंतोषाची भावना खदखदत आहे. या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी आणि विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढला आहे. मोर्चाला उपस्थित असलेल्या हजारो तरुण- विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही पुढील मागण्या करत आहोत.
१. मराठी भाषा व संस्कृतीच्या अभ्यास आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली असतानाही गेली अनेक वर्षे मराठी भाषा भवनाच्या निर्मितीचे काम रखडलेले आहे. विद्यापीठाने आता अधिक वेळ न दवडता हे काम त्वरित पूर्ण करावे आणि विद्यार्थी तसंच मराठीप्रेमी नागरिकांसाठी ते खुले करावे.
२. विद्यापीठ कॅम्पसमधील काही गटांमध्ये वाद व हाणामारी, विद्यार्थिनींची छेडछाड आणि ड्रग्जचे सेवन अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे अशांतता निर्माण होत आहे. विद्यापीठाची शिस्त मोडून येथील शांतता भंग करणार्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी नियमावली बनवावी.
३. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची- रोजगाराची कोणतीही शाश्वती नाही. विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरु करुन त्याला आॅनलाइन प्लेसमेंट पोर्टलची जोड द्यावी. विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे भरवण्यासाठी पुढाकार घ्यावा.
४. राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी दरवर्षी पुणे विद्यापीठात पदवी- पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छितात. मात्र पुरेशी वसतिगृहे नसल्यामुळे ग्रामीण भागांतून आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची हेळसांड होते. वसतिगृह न मिळाल्यामुळे प्रवेश अर्जांत घट होत असल्याचेही दिसून आले आहे. भविष्यात १०,००० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांची निर्मिती करण्याचे उद्दीष्ट्य विद्यापीठाने बाळगावे आणि त्या दिशेने त्वरित पावले उचलावीत.
५. विद्यापीठाची जी वसतिगृहे सध्या अस्तित्वात आहेत, त्यांपैकी अनेक वसतिगृहांची दुर्दशा झालेली आहे. मेसमधील जेवणाचा निकृष्ट दर्जा तर विद्यार्थ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. नवीन वसतिगृहांची निर्मिती करण्यापूर्वी विद्यमान वसतिगृहांचा सर्वांगीण दर्जा सुधारण्याला विद्यापीठ प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवे.
६. शिक्षणासाठी परदेशात किंवा परराज्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ट्रांस्क्रिप्ट अशा कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा संपूर्णपणे ऑनलाईन कराव्यात. अर्जाच्या हार्ड कॉपी मागवण्याची प्रक्रिया बंद करावी.
७. नगर आणि नाशिक उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून, तेथे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आल्यास किंवा त्याला शैक्षणिक कागदपत्रांची गरज भासल्यास त्यासाठी पुण्यात न येता त्याला ती उपकेंद्रातच उपलब्ध व्हावीत. रॅंक सर्टिफिकेट, मीडियम सर्टिफिकेट, अटेस्टेशन सर्टिफिकेट, एक्स्टर्नल ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट, एक्स्टर्नल डुप्लिकेट कार्ड आदी कागदपत्रांसाठी संबंधित विद्यार्थ्याला पुण्यात येण्याची गरजच भासू नये.
८. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. आॅक्टोबर २०२३ मध्ये दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा शासन निर्णय झाला आहे. या शासन आदेशाची अंमलबजावणी करुन किंवा आवश्यकता भासल्यास सीएसआरच्या माध्यमातून विद्यापीठाने गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची; तसेच एकवेळ जेवणाची सोय करण्यासाठी पावले उचलावीत.
९. आजही विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांत विशाखा समिती अस्तित्वातच नाही आणि ज्या महाविद्यालयांत विशाखा समिती आहे त्या समितीवर तेथील महिला शिक्षिकाच घेतलेल्या असून विद्यार्थिनींना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. यापुढे विशाखा समितीमध्ये त्या त्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्थान द्यावे आणि त्यांच्या मागण्या व प्रश्न महाविद्यालयांनी प्राधान्याने सोडवावेत. प्रत्येक महाविद्यालयातील महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्याबाबत विद्यापीठाने आग्रही पाठपुरावा करावा.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वर नमूद केलेल्या मागण्यांचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर योग्य निर्णय घ्याल, हीच एकमेव अपेक्षा. अन्यथा, भविष्यात आक्रमक आंदोलन करण्यावाचून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी.