पुणे-दौंड स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे, डेमू ऐवजी इमू आणि कोरोना काळात बंद करण्यात आलेले एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करणे आदी प्रमुख मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत .दौंड रेल्वे स्थानकाला पुणे विभागाशी संलग्न करण्याबाबत 21 फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच आता या स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे आवश्यक आहे. याशिवाय डेमू गाड्यांमुळे नागरीकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होत आहे. हे लक्षात घेता येथे इएमयू सुरु होणे आवश्यक आहे. याबाबत मंत्री यांनी सकारात्मक विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे, असे सुळे यांनी सांगितले आहे.
त्या म्हणाल्या ,’ बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दौंड जंक्शनला पुणे विभागाशी जोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव आपले मनापासून आभार. हा महत्वाचा निर्णय घेऊन नागरीकांची गैरसोय दूर केली हे आम्हा सर्वांसाठी मोलाचे आहे. यासोबतच रेल्वे खात्याकडे आमच्या काही महत्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. यातील पहिली मागणी अशी की, दौंड स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे आवश्यक आहे. याशिवाय दुसरी महत्वाची बाब म्हणजे डेमू गाड्यांमुळे नागरीकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होत आहे. याऐवजी येथे इएमयू सुरु होणे आवश्यक आहे. याबाबत मंत्रीमहोदयांनी सकारात्मक विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देणे आवशयक आहे. याशिवाय पर्यटनाच्या दृष्टीने तसेच जैवविधतेचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण असणारे स्थलांतरीत पक्षी भिगवण येथील पाणलोट क्षेत्रात उतरतात. त्यांना पाहण्यासाठी अनेक लोक येथे येतात. परंतु येथे पोहोचण्यासाठी रेल्वेची सेवा पुर्वीसारखी तत्पर राहिलेली नाही. कारण पुर्वी प्रत्येक एक्सप्रेस गाडी या स्थानकावर थांबत असे. याचा फायदा पंचक्रोशीतील नागरीकांनीही होत होता. कोविड काळात हा थांबा बंद करण्यात आला. आजही अनेक गाड्यांना भिगवण हा थांबा देण्यात आलेला नाही. रेल्वे मंत्रालयाने पर्यंटनाच्या आणि नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून विचार करुन येथे थांबा देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा