भाजप लोकसभेसाठीही धक्काच देणार ..
पुणे-राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी , भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांची देखील नाराजी दूर करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच नांदेड येथील भाजपचे जुने कार्यकर्ते डॉ. अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.मात्र या सर्वात नारायण राणे यांचा पत्ता मात्र कट झाला आहे.
नगरसेवक ,आमदार आणि आता खासदार पदी विराजमान होणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर पहा नेमके काय म्हटले.
नितीन गडकरींनी घरी जाऊन मेधा कुलकर्णींची घेतली होती भेट
पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांना आमदारकीचे तिकीट नाकारण्यात आल्यामुळे त्या नाराज होत्या. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या आहेत.मध्यंतरी मेधा कुलकर्णी यांचे पक्षांतर्गत डावलले जाण्याची भावना जास्त बळावली तेव्हा स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती ., मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन लवकरच होईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यानुसार त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने कोथरूडमध्ये काय काय दिले 1) राज्यसभा 2)शिक्षण मंत्री 3)पालकमंत्री 4) महापौर 5)स्थायी अध्यक्ष 6)भाजप प्रदेश अध्यक्ष. एवढे दिले असताना आता कोथरूडमध्येच लोकसभेची उमेदवारी ही देईल ?
दरम्यान भाजपच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची गणिते बिघडली आहेत.अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या नावाचा समावेश आहे.राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांचे नाव जाहीर केल्याने भाजपकडून ब्राह्मण समाजावर अन्याय होतो, अशी टीका आता कोणालाही करता येणार नाही. कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपने ब्राह्मण समाजाला डावलल्याची टीका केली जात होती.
मात्र, कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले सुनील देवधर यांचे समीकरण बिघडले आहे. राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केल्याने लोकसभेसाठी आता ब्राह्मण उमेदवार दिला जाईल असे वाट्त नाही.
प्रा. मेधा कुलकर्णी या कोथरूडमधील आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी त्याच भागातील उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांचे उमेदवारीचे ‘ चान्सेस ‘ कमी झाले आहेत. तर दुसरे इच्छूक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची संधी वाढली आहे.मात्र त्यांचा कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात किती प्रभाव आहे याचा अहवालाने त्यांची गोची होऊ शकणार आहे. त्यामुळे मुळीक यांनाही वगळून लोकसभेसाठी कोणाला अपेक्षीत नसणारे आणि पुणे महापालिकेतील सत्ता खेचून आणणारे वेगळे नाव भाजपने घोषित केले तर फारसे आश्चर्य वाटायला नको. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे मुळीक हे माजी आमदार आहेत.. दुसरे असे की, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी देऊन कोथरूडचे विद्यमान आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आपला मतदारसंघ ‘ सेफ ‘ करून ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे.आता देखील मेधा कुलकर्णी यांचे नाव कुठेही चर्चेत नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नाव भाजप श्रेष्ठींकडून अंतिम करण्यात आले. त्यांचे नाव समोर आल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेतील जे इच्छुक आहेत त्यांना डावलून इतर काही नावे देखील पक्षाकडून पुढे येऊ शकतात, असा सूचक इशारा भाजपने यानिमित्ताने दिला असल्याचे बोलले जात आहे.
कोण आहेत मेधा कुलकर्णी ?
प्रा. मेधा कुलकर्णी या 3 वेळा नगरसेवक होत्या. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे कुलकर्णी काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू झाली होती.
विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिला मोर्चाच्या केंद्रीय समितीवर केली होती.